अयोध्या पोळ यांच्यावरील हल्ल्याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी

महाराष्ट्र

मुंबई: कळवा भागात (दि. १६) रोजी एका कार्यक्रमात शिवसेनेच्या पदाधिकारी अयोध्या पोळ यांच्यावर काही लोकांनी हल्ला केला. या घटनेची शिवसेना उपनेत्या व विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे.

याबाबत त्यांनी दूरध्वनीवरून माहिती घेऊन संवाद साधला आणि त्यांना दिलासा दिला. या घटनेमध्ये दोषी असणाऱ्या व्यक्तींवर त्वरीत कारवाई करण्याबाबत त्यांनी स्थानिक पोलिसांकडे मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर ‘राजकारणात काम करणाऱ्या सर्वच महिलांना सन्मान आणि सुरक्षा मिळाली पाहिजे. समाजात, राजकरणात महिलांचे प्रतिनिधित्व एका बाजूला वाढत असताना अशा प्रकारच्या घटना होणे हे अत्यंत चुकीचे आहे.

राजकारणात काम करणाऱ्या महिलांना विशेष सुरक्षा मिळाली पाहिजे. अयोध्या पोळ यांच्यावरील हल्ल्याची तक्रार पोलिसांनी घेतली पाहिजे, यातील दोषींची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी,’ असे त्यांनी म्हटले आहे.