ठाणे: आपल्याला बोलायचा ,जगण्याचा,श्वास घ्यायचा अधिकार आहे हे आपण विसरून घेलो होतो.हे सर्व अधिकार आपल्याला आपल्या भारतीय संविधानामुळे परत मिळालेले आहेत. माणसाला माणसा सारख जगण्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिलाय, असे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कळवा शाखेने आयोजित केलेल्या संविधान दिनाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ वकिल अनुराधा परदेशी यांनी प्रमुख वक्त्या म्हणुन संविधानावर बोलताना प्रतिपादन केले.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणुन कोमसाप चे कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉ. प्रदिप ढवळ ,ठाणे अध्यक्ष बाळ कांदळकर, कळवा शाखेचे अध्यक्ष निशिकांत महांकाळ, कार्यकारिणी सदस्य ॲड. सुदर्शन साळवी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणुन प्राध्यापक डॉ. प्रदिप ढवळ यांनी आपल्या भाषणात संविधान निर्मितीचा संपुर्ण इतिहास सांगितला. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्रकृतीची तमा न बाळगता बनविलेलेले संविधान खरं तर प्रत्येक भारतीयाने आपल्या देवघरात ठेवल पाहिजे, असे मत ढवळ यांनी व्यक्त केले.
कोमसाप कळवा शाखेचे अध्यक्ष निशिकांत महांकाळ यांनी आपल्या प्रस्तावनेत शाखेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सांस्कृतीक भारत च्या संविधान गौरव विशेषांकाचे प्रकाशन या निमित्ताने करण्यात आले.कवी राजेंद्र ठाकुर यांनी संविधानावर कवीता सादर केली.