मारहाण आणि विनयभंगाच्या परस्पर तक्रारींनी प्रकरण तापले
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई परिसरात ३ एप्रिल रोजी घडलेल्या एका घटनेने अनपेक्षित वळण घेतले असून, त्याच घटनेतून मारहाण आणि विनयभंगाच्या परस्परविरोधी तक्रारी समोर आल्याने प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. पोलिसांसमोर नेमका घटनाक्रम उलगडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
प्राथमिक तपासानुसार, या घटनेची सुरुवात किरकोळ वादातून झाल्याचे समोर येत आहे. तक्रारदार शरीफ उस्मान पिंजारी (वय ३३) यांच्या म्हणण्यानुसार, ३ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास सुदाम इचके, शुभम इचके, भाऊ इचके, कैलास बच्चे आणि केतन माटे हे पाच जण त्यांच्या घरात जबरदस्तीने घुसले. पाणी मागण्याच्या कारणावरून वाद झाला आणि त्याचे रूपांतर थेट हल्ल्यात झाले. आरोपींनी लोखंडी पाईप, लाकडी काठ्या व बेल्टने बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात पिंजारी यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला असून, ते सध्या ससून रुग्णालयात उपचार घेत आहेत.
दरम्यान, याच घटनेचा दुसरा पैलू समोर आला असून चित्र पूर्णपणे वेगळे दिसत आहे. संबंधित गटातील एका विवाहित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, मारहाणीपूर्वी पिंजारी हे दारूच्या नशेत तिच्या घरात घुसले होते. त्यांनी तिचा हात पकडून धमकी दिली, ओढणी ओढली आणि अश्लील वर्तन करत विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. महिलेच्या आरडाओरडीनंतर तिचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतरच वाद वाढत मारहाणीपर्यंत पोहोचल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यामुळे ही घटना स्वतंत्र गुन्ह्यांची मालिका नसून एकाच वादातून उफाळलेला संघर्ष असल्याचे स्पष्ट होत आहे. एका बाजूला गंभीर मारहाण, तर दुसऱ्या बाजूला विनयभंगाचे आरोप—अशा दुहेरी स्वरूपामुळे प्रकरण अधिकच संवेदनशील बनले आहे.
दोन्ही बाजूंनी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक दोन्ही तक्रारींची सांगड घालत घटनाक्रम स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे.
वैद्यकीय अहवाल, साक्षीदारांचे जबाब आणि घटनास्थळावरील पुरावे यांच्या आधारे सत्य उलगडण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे कवठे येमाई परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रम पसरला आहे.