वाल्हे: देशाच्या सीमेवर प्राणपणाने लढणाऱ्या प्रत्येक सैनिकामुळेच आज आपण सुरक्षित आहोत. त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवून समाजाने सैनिकांसाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी काहीतरी ठोस केले पाहिजे, असे भावनिक प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सुमेधा योगेश चिथडे यांनी केले.
वाल्हे येथील महर्षी वाल्मीकी विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजविण्यासाठी आयोजित यशोगाथा व प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन ॲड. विद्या नामदेव भुजबळ यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य सतीश निगडे होते.
यावेळी सरपंच अतुल गायकवाड, सेवानिवृत्त कृषी अधिकारी सिद्राम भुजबळ, प्रा. नामदेव भुजबळ, बाळासाहेब राऊत, ज्योती एडके, माजी सरपंच विमल भुजबळ, अंकुश माळवदकर, रज्जाकभाई पानसरे, दामोदर पवार, साईनाथ चव्हाण, संजय ढावरे, सुचिता हिंगणे, सारिका बनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
चिथडे यांनी आपल्या कार्याची माहिती देताना सांगितले की, १९९९ साली पती योगेश चिथडे यांच्या सहकार्याने *‘सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन’*ची स्थापना करण्यात आली. या संस्थेमार्फत हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक, शैक्षणिक व मानसिक आधार देण्याबरोबरच वीरनारींना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात.
भारतीय सैनिकांसाठी राबविण्यात आलेल्या ठोस उपक्रमांविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, सियाचिन, लेह, लडाख व जम्मू-काश्मीरसारख्या अतिदुर्गम भागात देशातील पहिला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. कठीण हवामानात कार्यरत असलेल्या जवानांसाठी हे प्रकल्प मोठा आधार ठरत आहेत. हे कार्य म्हणजे सैनिकांप्रती कृतज्ञतेचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.
सैनिकांसाठी अखंड सेवाभाव जपणाऱ्या सुमेधा चिथडे यांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी आणि त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी, या हेतूनेच हा उपक्रम राबविण्यात आल्याचे ॲड. विद्या नामदेव भुजबळ यांनी सांगितले.
फाउंडेशनला भरभरून प्रतिसाद
कार्यक्रमानंतर महर्षी वाल्मीकी विद्यालय, ॲड. विद्या नामदेव भुजबळ, बाळासाहेब राऊत तसेच माजी विद्यार्थ्यांनी सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशनला आर्थिक मदत दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका नाजमिन अत्तार यांनी केले. शैला गवारी यांनी सूत्रसंचालन केले, तर सुदामा गायकवाड यांनी आभार मानले.