सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील हतुर गावातून भयंकर घटना समोर आली आहे. वृद्ध पतीने वृद्ध पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. तू शेतात न येणारी आज कशी काय आलीस? असा जाब विचारत पत्नीबरोबर पतीने वाद घातला.
दोघांच्या वादाचं रुपांतर मारहाणीत झालं. पतीने रागाच्या भरात डोक्यात फरशी घालून पत्नीची निर्घृण हत्या केली. पतीने पत्नीचा जीव गेला तरी फरशीचे प्रहार सुरूच ठेवले आणि वृद्ध पत्नीच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा केला.
गौराबाई नीलकंठ पाटील (वय 60, रा. पाटील गल्ली, हत्तूर) असं मृत महिलेचं नाव आहे. पती नीलकंठ भीमराव पाटील (वय 69, पाटील वस्ती हत्तूर ता दक्षिण सोलापूर) असं वृद्ध आरोपी पतीचं नाव आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर ते आनंदनगर दरम्यान असलेल्या वस्तीवर घडली.
अमावस्या निमित्त पूजा करण्यासाठी पत्नी शेतात गेली होती
गौराबाई पाटील या कधी शेतात येत नव्हत्या. पण, काल असलेल्या दीप अमावास्येनिमित्त पूजाअर्चा करून नैवेद्य दाखवण्यासाठी त्या शेतात आल्या होत्या. त्याचवेळी पती नीलकंठबरोबर त्यांची वादावादी झाली. दोघांचा वाद विकोपाला गेला. त्यानंतर पतीने गौराबाई यांची निर्घुण हत्या केली. गौराबाई या मागील काही दिवसांपासून मुलाकडे राहत होत्या. पण त्या नुकत्याच हत्तुर येथे राहण्यास आल्या होत्या.
गावाला जाण्याच्या अन् देखभाल करण्याच्या कारणातून पती-पत्तीमध्ये वारंवार भांडणं होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याच भांडणातून, रागाच्या भरात पतीने पत्नीला संपवल्याची घटना समोर आली आहे. रात्री उशिरापर्यंत वृद्ध पतीवर गुन्हा दाखल करण्याचं काम विजापूर नाका पोलीस ठाण्यात सुरू होतं.
मला पोलीस का घेऊन गेले नाहीत?
पत्नीची हत्या केल्यावर आरोपी पती तेथील शेतीच्या जवळून जाणाऱ्या रस्त्यावर बसला होता. त्यानंतर लोकांनी विचारल्यानंतर पती मला पोलीस अजून कसे काय घेऊन गेले नाहीत, असा प्रश्न विचारत असल्याची माहिती आजूबाजूच्या नागरिकांनी दिली.
दोन्ही मुलं उच्च शिक्षित
पाटील दाम्पत्याला दोन विवाहित मुलं आहेत. त्यांचा एक मुलगा बंगळुरूमध्ये आयटी क्षेत्रात कार्यरत आहे, तर दुसरा हत्तूरमध्ये राहतो. अबोल असणारे नीलकंठ पाटील अचानक इतके कसे आक्रमक झाले, याची गावात एकच चर्चा सुरू असून त्यांच्या या क्रूर कृत्याने खळबळ उडाली आहे.