मुंबई: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलले. यावेळी बोलताना मला निश्चित दुःख झाले आहे असे त्यांनी म्हंटलं आहे. शिवाय एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत असं उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदे दरम्यान सांगितलं. शिवसेनेशी बंड केल्यापासून एकनाथ शिंदे वारंवार आम्ही शिवसेनेचे आहोत. आम्ही हे सर्व हिंदुत्वासाठी करतोय असे सांगितले आहे. बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही झगडतोय असे देखील त्यांनी वारंवार सांगितले आहे. मात्र पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, असं स्पष्टपणे सांगितलं आहे. शिवसेनेला वगळून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी मांडले तीन महत्वाचे मुद्दे
हे अडीच वर्षांपूर्वीच का नाही केलं?
शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा होता तर अडीच वर्षांपूर्वीच का नाही केलं? हेच तर मी अडीच वर्षांपूर्वी सांगत होतो अमित शहा यांना अडीच वर्षे मुख्यमंत्री पद वाटून घेऊ असे सांगितले होते. मग त्यावेळेला ते मान्य का केला नाही? मला का मुख्यमंत्री केले असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका
आरे चा निर्णय बदलला तो वाईट आहे असे त्यांनी म्हंटले आहे. माझा राग मुंबईवर काढू नका, माझ्या पाठीत खंजीर खुपसला मुंबईकरांच्या काळजात सुरा खुपसू नका असे त्यांनी यावेळी म्हंटले. माझ्यावर राग आहे ठीक आहे. माझ्या पाठीत खंजीर खुपसला ठीक आहे पण मुंबईवर माझा राग काढू नका . आरे चा निर्णय बदलल्याचं वाईट वाटलं. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका. मी पर्यावरणासोबत आहे. आरे चा निर्णय कृपा करून रेटून नेऊ नका असे ते पत्रकार परिषदेत म्हणाले. शिवाय सध्या त्यांचं रात्रीस खेळ चाले हे चाललंय… असा टोला देखील त्यांनी फडणवीसांना लगावला.
लोकशाहीचे धिंडवडे निघत आहेत
लोकशाहीचे चार स्तंभ असतात. लोकांचा लोकशाही वरचा विश्वास उडून चाललाय. लोकशाही वाचवण्याची गरज निर्माण झाली आहे. लोकशाहीचे धिंडवडे निघत आहेत ते थांबवण्याची गरज आहे असेही ते म्हणाले.