शिरूरः शिरूर-आंबेगाव मतदार संघातून सात वेळा निवडून आलेले दिलीप वळसे पाटील यांच्या विरुद्ध त्यांचेच एक कार्यकर्ते देवदत्त निकम यांनी शरद पवार यांना आपला पाठिंबा दर्शवीत वळसे-पाटील यांच्या तालुक्यातील मक्तेदारीला आव्हान देत शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे.
देवदत्त निकम यांनी राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांना आपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे तालुक्यातील अनेक नागरिकांचा अप्रत्यक्ष निकम यांना पाठिंबा मिळत असलेला सोशल मीडियावर दिसून येत आहे. मुंबई येथे उद्या होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मीटिंगसाठी आंबेगाव तालुक्यातून देवदत्त निकम यांच्या बरोबरच तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते जाणार असल्याचे सांगण्यात आले. अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांची पहिली जाहीर सभा आंबेगाव तालुक्यात होणार आहे. या सभेत पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्यासोबत गेल्यामुळे शिरूर तालुक्यात नाराजीचा सुरू आहे. सोशल मीडियावर अनेकांनी आपली नाराजी व्यक्त करत दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका केली आहे.
अजित पवार यांनी रविवारी (ता. २) सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण त्याहीपेक्षा जास्त मोठा धक्का प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे. शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांना पाठिंबा कसा काय दिला हाच प्रश्न सर्वांना सतावत आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी यावर भाष्य करताना दिलीप वळसे पाटील गेल्यामुळे शरद पवार यांच्या डोळ्यात अश्रू आले होते असा खुलासा केला आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दल विचारण्यात आले असता आव्हाड म्हणाले, ‘ज्या मुलाला हातावर बाळासारखं हातावर खेळवलं त्याने असे करावे. नियतीने यापेक्षा मोठा त्रास शरद पवार यांना काय द्यावा. तो सर्वात लाडका विद्यार्थी होता. दिलीप म्हटलं की सगळं बाजूला. शरद पवार यांना ह्रदय नाही असं वाटतं का? शरद पवार यांनी मला दिलीपही मला जायचे आहे, असे सांगून गेला, तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. त्यांच्या डोळ्यात एक अश्रू दिसत होता. इतका माणूस निष्ठूर नसतो.’