DamuAnna Ghode Marriage

ग्रामपंचायतीच्या निकालानंतर दामुशेठ घोडे यांच्या विवाहाची चर्चा…

राजकीय

सविंदणे (अरूणकुमार मोटे): टाकळी हाजी सह माळवाडी, सरदवाडी, म्हसे या ग्रामपंचायंतीवर वर्चस्व मिळवून बेट भागाचे किंगमेकर ठरलेले दामुशेठ घोडे यांनी टाकळी हाजी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान टाकळी हाजीच्या पहिल्याच प्रचार सभेत ही माझी निवडणूक नसून माझे लग्न आहे असे विधान केले होते. या विधानावर विरोधी पॅनल कडून जोरदार टीका करण्यात आली होती. ५ ऑगस्ट रोजी निवडणुकीच्या निकालानंतर मात्र घोडे यांनी लग्न सोहळा संपन्न करत अगदी लग्नातील सर्व विधी पार पाडून त्यांचा शब्द खरा करून दाखविला.

शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील ४ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये दामुशेठ घोडे यांच्या दामुआण्णा घोडे प्रतिष्ठान- मळगंगा ग्रामविकास पॅनल ने १६-०१ असा दणदणीत विजय संपादन केला आहे. यापूर्वी दामुशेठ घोडे यांनी त्यांच्या प्रभागामधून सलग पंधरा वर्ष बिनविरोधची परंपरा राखली होती. परंतु, या निवडणुकीत माजी आमदार पोपटराव गावडे यांच्याबरोबरचे राजकीय मतभेद ताणले गेले असल्याने त्यांना निवडणुकीला सामोरे जावे लागले. घोडे यांनी पण एकही जागा बिनविरोध होवू नये म्हणून सर्व सतरा जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले. काही जागांवर विरोधी पॅनलकडून तगडे उमेदवार पाहून त्यांच्या विरोधात कुणीही लढायला तयार होत नसल्याचे पाहून सदर ठिकाणी दामूशेठ यांनी आपल्याच घरातील पत्नी व सुन यांना उमेदवारी दिली.

प्रचाराच्या पहिल्याच सभेत दामुशेठ घोडे यांनी मतदारांना भावनिक आवाहन करताना ही निवडणूक नसून हे माझे लग्न आहे. मी चार नंबर प्रभागाचा नवरदेव आहे तर एक नंबर प्रभागमधून अरूणाताई माझी नवरी आहे. दोन नंबर प्रभागातील त्यांची उभी असलेली सुनबाई ही आमची कलवरी आहे. तुम्ही सर्वजण माझे वऱ्हाडी आहात. आणि निकाल म्हणजेच माझे लग्न असेल. अशा प्रकारे केलेल्या विधानावर ‘बोलतो ते करतो आणि करतो तेच बोलतो’ हे सिध्द करत निकाल लागल्यानंतर टाकळी हाजी येथील कुंड पर्यटन स्थळ येथील मंगल कार्यालयात जावून एक अनोखा विवाह सोहळा संपन्न केला. हे मंगल कार्यालय माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या भागातील सर्वसामान्य लोकांच्या सोईसाठी शासनाकडून उपलब्ध करून दिले आहे. येथे विवाहासाठी सर्वसामान्य माणसांना मोठी रक्कम उकळले जायची. हाच मुद्दा दामुशेठ घोडे यांनी निवडणुक काळात उपस्थित केला व पुढील काळात गोरगरीबांचे विवाह नाममात्र दरात करण्यात येणार असल्याचे दामुशेठ यांनी आज प्रत्यक्षात स्वताचा विवाह करून दाखवून दिले. यावेळी गावातीलच नव्हे तर कवठे येमाई, वडनेर, मलठण, माळवाडी, म्हसे, फाकटे व बेट भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वऱ्हाडी मंडळींनी भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती.

या दिमाखदार सोहळ्याची चर्चा शिरूर तालुक्यासह जिल्हयात सर्वत्र होत असून, चक्क या विवाह सोहळ्यास घोडे दाम्पत्याचे मुले, सूना, नातवंडे व नातेवाईक सुध्दा उपस्थित होते. सर्व जण या आगळ्या वेगळ्या सोहळ्याने भारावून गेले होते.

टाकळी हाजी मध्ये दामूशेठ घोडे यांची १६-१ ने एकहाती सत्ता, गावडे गटाचा दारुण पराभव

जांबुत येथे सत्ता परिवर्तन जय मल्हार ग्रामविकास पॅनल ६-५ ने विजय

म्हसे ग्रामपंचायतमध्ये काळेश्वरी ग्रामविकास पॅनेलने ५-२ ने मिळवला विजय

माळवाडी ग्रामपंचायतीमध्ये माळवाडी ग्रामविकास परीवर्तन ग्रामविकास पॅनेलचा ६-१ ने विजय