मिरा-भाईंदर : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मिरा-भाईंदरच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. शिवसेनेला धक्का देत माजी नगरसेविका नर्मदाताई वैती यांनी शेकडो समर्थक आणि कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यासोबतच शिवसेनेचे शहर संघटक प्रसाद सुर्वे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार नरेंद्र मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत १५ ऑगस्ट रोजी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
नर्मदाताई वैती यांचा मिरा-भाईंदरच्या राजकारणात दीर्घ अनुभव आहे. २००७ ते २०१७ या कालावधीत त्यांनी भाईंदर पूर्वच्या नगरसेविका म्हणून काम केले आहे. तसेच मिरा-भाईंदर महापालिकेच्या महिला व बालकल्याण उपसभापतीपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे. मागील सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती.
कुठलीही निवडणूक तोंडावर नसताना वैती आणि सुर्वे यांच्यासारख्या अनुभवी पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. या पक्षप्रवेशामुळे आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली मिरा-भाईंदरमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, मिरा-भाईंदर हा शिवसेना नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांचा प्रभाव असलेला मतदारसंघ मानला जातो. स्थानिक पातळीवर भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक यांच्यात अनेकदा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला आहे.
त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देत नरेंद्र मेहता यांनी सरनाईक यांच्या प्रभावक्षेत्रातच राजकीय धक्का दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पक्षप्रवेशाचा आगामी स्थानिक राजकारणावर नेमका काय परिणाम होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.