स्थानिक प्रशासन व पदाधिकाऱ्यांसह पुढाऱ्यांचे दुर्लक्ष
शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथून शिक्रापूर पाबळ रस्त्याने जाणारा बेल्हा जेजुरी महामार्ग रस्ता नव्याने बनवण्यात आलेला असून सध्या सदर रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून स्थानिक पदाधिकाऱ्यांसह पुढाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांना जीव गमवावा लागत आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथून गेलेला बेल्हा जेजुरी महामार्ग नव्याने झालेला असल्याने सदर रस्त्यांवर कोठेही गरीरोधक नाही तसेच अनेक धोकादायक ठिकाणे दर्शवणाऱ्या फलकांसह गाव, शाळा दाखवणारे फलक देखील येथे नाही. मात्र सध्या रस्ता चांगल्या दर्जाचा झाल्याने येथून वाहने भरधाव वेगाने जात असतात तर अनेक जण पर्यायी रस्ता म्हणून या रस्त्यांचा वापर करत असतात.
सदर परिसरात शेतीचे प्रमाण जास्त असल्याने शेतकऱ्यांची वाहने तसेच जनावरे सुद्धा या रस्त्याने ये जा करत असतात. मात्र या महामार्गाच्या कडेला जातेगाव बुद्रुक, मुखई, धामारी, पाबळ हि गावे असून रस्त्यांच्या कडेलाच शाळा, महाविद्यालय, बाजार, बँका आहेत. परंतु बेल्हा जेजुरी महामार्गावर कोठेही गतिरोधक नसल्याने रस्त्यावर अनेक लहान मोठे अपघात होऊन काही नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.
अनेकदा वाहने उलटून वाहने रस्त्याच्या कडेला जाऊन देखील उलटली आहेत. अलीकडील काळात एका महिन्यात 10 ते 15 अपघात शिक्रापूर ते पाबळ पर्यंत होत आहेत. अनेकदा काही जनावरांचा देखील अपघात झालेला असल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. अनेक अपघात होत असताना देखील प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत असून रस्त्यावर दुभाजके बसवण्याची मागणी या भागातील नागरिक करत आहेत.
जिल्हा परिषद ईच्छुकांच्या आंदोलनाचे काय?
सदर रस्त्याच्या परिसरातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या एका पदाधिकाऱ्याने मागील महिन्यात सदर रस्त्यावर दुभाजक बसवण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र आंदोलन देखील झाले नाही आणि अद्याप दुभाजक देखील बसले नाही. त्यामुळे जिल्हा परिषद ईच्छुकांच्या आंदोलनाचे काय झाले, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.