शिरुर; पाण्याच्या प्रश्नावर निवडणुक पण पाण्याची जबाबदारी कोण घेणार…? शेतकऱ्यांचा राजकीय नेत्यांना थेट इशारा…?

इतर

पाबळ (तेजस फडके): आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई, चिंचोली मोराची आणि शास्ताबाद या गावांचा ज्वलंत पाणीप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असुन ‘पाण्याच्या प्रश्नावर मतं घ्यायची, पण पाणी द्यायची जबाबदारी कुणाची…? असा थेट आणि आक्रमक सवाल शेतकऱ्यांनी राजकीय नेत्यांना केला आहे.

प्रत्येक निवडणुकीत पाबळसह बारा गावांचा पाणीप्रश्न गाजवला जातो. मात्र निवडणुक संपताच तो फाईलमध्येच गाडला जातो, असा आरोप ग्रामस्थांकडुन होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून केवळ आश्वासनांची पाणपोई सुरु असुन, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या शेतात आणि गावकुसाबाहेर आजही पाणी पोहोचलेले नाही हि वस्तुस्थिती आहे.

सध्या ऐन थंडीतही जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारामुळे राजकीय वातावरण मात्र गरम झाले असुन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला इच्छुक असणारे राजकीय नेते एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. तसेच विकासकामांच्या जाहिरातींच्या बॅनरने परीसर भरुन गेला आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी रस्ते, सभामंडप, बंधारे, नाले यासाठी खर्च झाला. मात्र शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या पाणीप्रश्नासाठी निधी कुठे गेला…? असा सवाल आता शेतकरी उघडपणे विचारत आहेत.

रांजणगाव-कारेगाव गटात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अनेक दिग्गज नेते मैदानात उतरले असताना, एकाही उमेदवाराने पाणीप्रश्नावर ठोस आराखडा, कालबद्ध योजना किंवा लेखी हमी दिलेली नाही, हि बाब संतापजनक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी “जो उमेदवार पाण्यासाठी रस्त्यावर उतरेल, संघर्ष करेल आणि पाणी आणून दाखवेल, त्यालाच मत मिळेल, फक्त सभा, भाषण आणि फलक नकोत” असा स्पष्ट इशाराचं दिला आहे.

त्यामुळे आता पाणीप्रश्नावर पेटलेल्या या तीन गावांतील जनतेचा रोष कोणत्या नेत्यावर भारी पडणार आणि ‘पाणी नाही तर मत नाही’ ही घोषणा निवडणुकीचा निकाल बदलणार का…? याकडे संपुर्ण शिरुर तालुक्याचे लक्ष लागले आहे. त्यामुळे रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गट हा आता एकमेकांवर केलेल्या आरोप-प्रत्यारोपांबरोबरचं पाणीप्रश्नाबाबतही चर्चेत राहणार असचं काहीस चित्र सध्या या गटात दिसत आहे.