शिरूर तालुक्यात लंपी रोगाचा प्रकोप; शेतकऱ्यांचे जनावरे संकटात, भरपाई व तत्काळ उपचाराची मागणी तीव्र

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): सध्या शिरूर तालुक्यातील विविध गावांमध्ये गोवंश जनावरांमध्ये लंपी स्किन रोगाने थैमान घातले असून शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार असलेल्या जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी जनावरे आजारी पडत असून काही ठिकाणी जनावरांचे मृत्यूही झाले आहेत. या गंभीर परिस्थितीकडे शासनाचे व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

सरकारी डॉक्टरांचा अभाव, उपचारांना खोळंबा

गावोगावी सरकारी पशुवैद्यकीय डॉक्टर वेळेवर उपलब्ध होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. किरकोळ खासगी डॉक्टरांकडून उपचार करूनही रोगावर फारसा परिणाम होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे सरकारी स्तरावरून जलद हालचाल होणे आवश्यक आहे. असे मत शेतकरी निवृत्ती(नाना )काळोखे यांनी व्यक्त केले आहे.

संक्रमणाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पशुवैद्यकीय विभागाने तातडीने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून रोगग्रस्त जनावरांची नोंद घ्यावी, तसेच लक्षणे दिसणाऱ्या जनावरांवर त्वरित उपचार सुरू करावेत, अशी ग्रामस्थांची जोरदार मागणी आहे.

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी

लंपी रोगामुळे जनावरे मृत झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई देण्याचे ठोस धोरण राबवावे, अशी मागणी गावागावातील सरपंच, ग्रामसेवक व शेतकरी करत आहेत. शेतकऱ्यांना आधार देणारी ही जनावरे मृत झाल्यास त्यांचे आर्थिक गणित कोलमडते. त्यामुळे भरपाई ही काळाची गरज बनली आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित गावातील सरपंच व ग्रामसेवक यांनी एकत्रितपणे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने उपाययोजना राबवाव्यात. याबाबत लवकरात लवकर बैठक घेऊन परिस्थितीचे गांभीर्य वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणे अत्यावश्यक आहे.

शेतकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी एकजूट हवी

हा लंपी रोग केवळ जनावरांपुरता मर्यादित न राहता शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान घडवतो. त्यामुळे शासन, प्रशासन व ग्रामपंचायतींनी एकत्रितपणे काम करून या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.