मुंबई: बदलापूरमध्ये एका चिमुकल्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असून, महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेली असल्याची तीव्र टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून सरकार गुन्हेगारांसमोर हतबल झाले असल्याचा आरोपही त्यांनी केला.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना सपकाळ म्हणाले की, चार-पाच वर्षांच्या मुलींवर अत्याचार होत असताना मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना झोप कशी लागते? बदलापुरात यापूर्वीही अशाच प्रकारची घटना घडली होती. मात्र त्या प्रकरणात सरकारने दोषींवर ठोस कारवाई न करता महत्वाच्या आरोपींना मोकळे सोडले. जनतेच्या तीव्र आंदोलनानंतर सरकार जागे झाले, पण पुढे त्या प्रकरणाचे काय झाले हे सर्व राज्याने पाहिले आहे, असे ते म्हणाले.
भाजपा व संघाशी संबंधित शाळेत घडलेल्या प्रकरणात शाळेच्या अध्यक्ष व सचिवावर कारवाई करण्यात आली नाही. पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल असतानाही शाळेच्या सचिवाला भाजपाने स्वीकारलेला नगरसेवक केल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. प्रशासन निष्क्रिय असल्यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर भाष्य करताना सपकाळ म्हणाले की, मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप असूनही पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. अशा मंत्र्यांसह सरकार कसे चालते, असा प्रश्न उच्च न्यायालयालाही विचारावा लागतो, ही गंभीर बाब आहे.
अंकिता भंडारी प्रकरण, उन्नाव बलात्कार, महिला कुस्ती खेळाडूंवरील लैंगिक अत्याचार यांसह अनेक प्रकरणांत भाजपाशी संबंधित लोकांची नावे समोर आली, पण कारवाई मात्र झाली नाही. राज्यात वाळू माफिया, ड्रग्ज माफिया, लँड माफिया यांना मोकळे रान मिळाले असून महिला व मुलींची सुरक्षा पूर्णपणे रामभरोसे असल्याचा आरोपही त्यांनी केला.
बदलापूरच्या ताज्या प्रकरणात सरकारने तात्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा जनतेचा उद्रेक होईल आणि जनता रस्त्यावर उतरेल, असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.