नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

महाराष्ट्र

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे ‘नशामुक्त मुंबई’ अभियानाची सुरुवात 30 जुलै रोजी वरळी डोम येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. हे अभियान केवळ उद्घाटनापुरते मर्यादित नसून, वर्षभर चालणारी व्यापक जनजागृती मोहीम असेल, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

अभियानाच्या पूर्वतयारीसंदर्भातील आढावा बैठकीत मंत्री लोढा यांनी समाजातील सर्व घटक, विशेषतः विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी या जनचळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. बैठकीला उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल (ऑनलाइन), महापालिका, शिक्षण विभाग आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून, ऑनलाइन आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून लाखो नागरिकांना व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ दिली जाणार आहे.

राज्यभरातील प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात विद्यार्थी सुरक्षा समितीच्या माध्यमातून वर्षभर व्यसनमुक्तीविषयक विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सातवीपासून पुढील विद्यार्थ्यांसह महाविद्यालये, आयटीआय, शिक्षक आणि पालकांचा या मोहिमेत सहभाग सुनिश्चित करण्यात येणार आहे. तसेच व्यसनमुक्ती क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था, मानसोपचारतज्ज्ञ, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांनाही अभियानात सहभागी करून घेतले जाणार आहे.

वरळी डोम येथील मुख्य कार्यक्रमाचे मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून, ‘नशामुक्त मुंबई’ ही लोकचळवळ बनविण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत