मुंबई: शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचाराचा प्रकार जालना जिल्ह्यात उघडकीस आला आहे. अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील सुमारे २४ कोटी ९० लाख ७७ हजार ८११ रुपयांच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील मुख्य आरोपी आशिष प्रमोदकुमार पैठणकर याला आर्थिक गुन्हे शाखेने अखेर अटक केली आहे.पैठणकर हा घनसावंगी तहसील कार्यालयात सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून कार्यरत होता.
महाघोटाळ्याची पार्श्वभूमी
अंबड आणि घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. सरकारने जाहीर केलेली मदत वाटप करत असताना, महसूल विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून मोठी खेळी रचली. शेकडो बनावट व्यक्तींची नावे लाभार्थ्यांच्या यादीत घुसडून, सरकारी तिजोरीतून आलेली रक्कम स्वतःच्या आणि परिचितांच्या खात्यावर वळवण्यात आली.
चौकशीतून बाहेर आले तथ्य
जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी मिळाल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी तीन सदस्यीय चौकशी समिती नेमली. समितीच्या अहवालात २५ कोटींच्या अफरातफरीचा तपशील समोर आला. त्यानंतर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि तपास सुरू झाला.
फरार आरोपी पकडला
मुख्य आरोपी आशिष पैठणकर हा गेल्या पाच महिन्यांपासून फरार होता. अटकपूर्व जामिनासाठी त्याचे प्रयत्न सुरू असताना, गुप्त माहितीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेने सापळा रचून त्याला अटक केली.
मोठी साखळी उघडकीस
सुरुवातीला २८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. तपास वाढल्यावर आतापर्यंत ३२ आरोपींना अटक करण्यात आली असून, अद्याप ३ आरोपी फरार आहेत. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या इतर ‘पांढरपेशी’ गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.