शिरुर (अरुणकुमार मोटे) जांबुत (ता. शिरुर) येथे सोमवारी (दि २६) रोजी बिबट्याच्या हल्ल्यात मुक्ताबाई भाऊ खाडे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत जांबुत ग्रामस्थांनी आक्रमकतेचा पवित्रा घेत वनविभागाच्या विरोधात संताप व्यक्त केला असुन नातेवाईक व कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास थेट नकार दिला असल्याची माहिती समोर येत आहे.
गेली दोन वर्षात बिबट्याच्या हल्ल्यात मनुष्यावर हल्ले होऊन मृत्यू होण्याची ही चौथी घटना असुन वनविभागाकडून कोणत्याही ठोस उपाय योजना करण्यात येत नसून वाढत्या बिबट संख्येला आळा घालण्यास शिरुर वनविभाग अपयशी ठरला असल्याचे दिसुन येते. या घटनेचा निषेध करण्यासाठी जांबुत ग्रामस्थांनी बस स्थानकावर बैठक घेऊन प्रशासनाचे विरोधात आज मंगळवार (दि २८) रोजी दुपारी रास्ता रोको करुन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशनला निवेदन देऊन दुपारी हे आंदोलन होणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
शिरुरच्या बेट भागातील एकाच गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात बिबट्याची संख्या वाढलेली आहे. मोठ्या प्रमाणात मनुष्यावर हल्ले झालेले आहेत. या हल्ल्यात चार जणांना आपला निष्पाप जीव गमवावा लागला आहे. तर कित्येक प्रमाणात पशुधन धोक्यात आलेले असताना देखील ठोस उपाययोजना करण्याऐवजी वनविभाग प्रशासन मूग गिळून गप्प बसले आहे काय…? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी घटनास्थळी उपस्थित केला आहे.
वनविभाग पिंजरे लावण्यासाठी अथवा बिबट समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी जर सर्वसामान्यांना शिरुर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी कायदा दाखवत असतील तर अजूनही वनविभाग किती बळी जाण्याची वाट बघत आहे अशी खेदजनक भावना ग्रामपंचायत सदस्य राहुल जगताप यांनी व्यक्त केली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी जगताप यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात असून वनविभागाविरोधात जांबुत परिसरातील नागरिक आक्रमक झाले आहेत.
शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई गावात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
जांबुत येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार, जांबुत येथील चौथी घटना, वनविभागाचा गलथान कारभार समोर