शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्र राज्यातील दरवर्षी साखर कारखाने २५ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर पर्यंत सुरु होतात. फार उशीर झाला तर ५ नोव्हेंबर दरम्यान कारखाने चालु होतात. भीमाशंकर साखर कारखाना दरवर्षी ऑक्टोबरच्या शेवटी सुरु होतो. परंतु तुम्हाला निवडणुकीसाठी कारखान्याचे कर्मचाऱ्यांची गरज असल्यामुळे तुम्ही कारखाना अजुनही सुरु केला नाही असा गंभीर आरोप नाव न घेता देवदत्त निकम यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर केला.
बुरुंजवाडी (ता. शिरुर) येथे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निकम बोलत होते. यावेळी पुढे बोलताना निकम म्हणाले, भीमाशंकर साखर कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन ८००० टन इतकी आहे. भीमाशंकर सहकारी साखर कारखाना एका हंगामात १० ते १२ लाख टन उसाचे गाळप करतो. कारखाना एक महिना उशिरा चालु झाल्यास एका महिन्यात २ लाख टन उसाचे गाळप कमी होणार असुन भविष्यात ऊस शिल्लक राहणार असल्याचे ते म्हणाले.
तसेच भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे पगारी कर्मचारी दिलीप वळसे यांच्या प्रचारासाठी आंबेगाव-शिरुर मतदार संघात फिरतात. परंतु माझ्यासाठी तुमच्यासारखी सर्वसामान्य माणसं स्वखर्चाने माझा प्रचार करतात. विधानसभा निवडणुकीला तुम्हाला कारखान्याची यंत्रणा वापरायची म्हणुन एक महिना तुम्ही कारखाना बंद ठेवला हे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान आहे”. अशा शब्दांत महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांनी अप्रत्यक्षरित्या सहकारमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला.
ऊस तोडणी करणारे मजुर उन्हाळा सुरु झाला की मार्च-एप्रिल मध्ये ऊस तोडायला नकार देतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. सध्या आंबेगाव तालुक्यात उसाच ५० एकर जळीत क्षेत्र आहे. पण तो ऊस कधी तोडला जाणार, निवडणुकीसाठी एक महिना तुम्ही कारखाना बंद ठेवला. तर या शेतकऱ्यांनी हा ऊस कोणत्या कारखान्याला द्यायचा हा मोठा प्रश्न आहे.
यावेळी आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष शेखर पाचुंदकर, संभाजी धुमाळ, पंढरीनाथ कांबळे, कैलास धुमाळ, गुलाबराव धुमाळ, कुमार नाणेकर, कुंडलिक जाधव, सचिन पोकळे, संतोष भोगावडे, कुलदीप धुमाळ, उमेश धुमाळ, परशुराम डांगे, पंढरीनाथ तांबे, संपत धुमाळ तसेच रांजणगाव पंचायत समिती गणातील ग्रामस्थ उपस्थित होते.