तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी किती तासांनी पिणं योग्य

आरोग्य

सध्या बदलत्या काळानुसार प्रत्येकजण आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतो. आरोग्याची काळजी घेताना आपण स्वतःला अनेक चांगल्या सवयी लावून घेतो, या सवयींपैकीच एक सवय म्हणजे तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे. भारतीय संस्कृतीत तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून पिणे ही एक पारंपरिक आणि आरोग्यदायी सवय मानली जाते.

आयुर्वेदानुसार, तांबे हा धातू शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो तसेच तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याने पचन सुधारते, टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते असे अनेक फायदे होतात. परंतु तांब्याच्या भांडयात पाणी नेमके किती वेळासाठी भरुन ठेवावे, याबद्दल फारशी माहिती अनेकजणांना नसते. तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे जसे फायदेशीर आहे, तसेच हे पाणी जास्त प्रमाणात प्यायले तर ते शरीरासाठी हानिकारकही ठरू शकते. यासाठीच, तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी पिण्याची योग्य वेळ आणि प्रमाण जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते.

तांब्याच्या भांड्यात पाणी किती वेळासाठी साठवून ठेवू शकतो

तांब्याच्या भांड्यात पाणी किमान ६ ते ८ तास ठेवले पाहिजे, जेणेकरून त्यामधील तांब्याचे आयन्स (कॉपर आयन्स) पाण्यात मिसळू शकतील आणि त्यामुळे शरीराला त्याचे जास्तीत जास्त आरोग्यदायी फायदे मिळू शकतील. यामुळेच रात्री तांब्याच्या ग्लासात किंवा लोट्यात पाणी साठवून ठेवण्याचा आणि सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी ते पिण्याचा सल्ला दिला जातो. या संपूर्ण प्रक्रियेला ‘ताम्र जल चिकित्सा’ असे म्हणतात. अशा पद्धतीने पाणी पिण्यामुळे शरीरातील विषारी घटक (टॉक्सिन्स) बाहेर टाकले जातात आणि चयापचय क्रिया अधिक गतिमान होते, जे एकंदर आरोग्यासाठी फायदेशीर असते.

तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी पिण्याचे फायदे… 

तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी नियमितपणे प्यायल्यास शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. पचनसंस्था मजबूत होते, ज्यामुळे अन्न पचण्याची प्रक्रिया सुधारते. लिव्हर आणि किडनी यांना विषमुक्त करण्यात मदत होते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ज्यामुळे विविध संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळते. हे पाणी वजन कमी करण्यास देखील मदत करते. तांब्याच्या पाण्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे शरीराला संसर्गांपासून वाचवतात. त्वचेवरील मुरुम, डाग, आणि त्वचारोग यासारख्या समस्या कमी होण्यास मदत होते, त्यामुळे त्वचा अधिक स्वच्छ आणि निरोगी दिसते.

पण जास्त प्रमाणात पिणे हानिकारक ठरु शकते… 

तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी जरी फायदेशीर असले, तरी ते मर्यादित प्रमाणातच प्यावे, अन्यथा ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. दिवसातून एक किंवा दोन ग्लास तांब्याच्या भांडयातील पाणी पिणे पुरेसे असते.

अति प्रमाणात तांबे हा धातू शरीरात गेल्यास “कॉपर टॉक्सिसिटी” म्हणजेच तांब्याचे विषारी परिणाम शरीरावर होऊ शकतात. त्यामुळे उलट्या, डोकेदुखी, पोटदुखी, तसेच लिव्हरचे नुकसान आणि किडनीवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे दिवसभरात प्यायले जाणारे सगळेच पाणी तांब्याच्या भांड्यात साठवून ठेवू नका. तसेच, तांब्याचे भांडे नेहमी स्वच्छ आणि कोरडे ठेवणे गरजेचे असते. वेळोवेळी लिंबाचा रस, मीठ किंवा व्हिनेगर वापरून ते स्वच्छ करत राहावे, म्हणजे भांड्यावर आलेले डाग, मळ आणि ऑक्सिडेशन सहज निघून जाईल. याशिवाय, लिंबूपाणी, चिंच, ताक किंवा फळांचे रस यांसारखे आंबट व आम्लयुक्त पदार्थ कधीही तांब्याच्या भांड्यात ठेवू नका, कारण यामुळे जास्त प्रमाणात तांबा धातू पाण्यात विरघळू शकतो, जे शरीरासाठी घातक ठरू शकते.

(सोशल मीडियावरून साभार)