अस्लम शेख यांची सूचना चांगली, सूचनेचा निश्चितपणे विचार केला जाईल: देवेंद्र फडणवीस
मुंबई: वर्षानुवर्षे पुनर्विकास प्रकल्प रखडवणाऱ्या विकासकांना कायमस्वरुपी काळ्या यादीत टाकण्याची मागणी माजी मंत्री आणि आमदार अस्लम शेख यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विधानसभेत केली. विधानसभेत तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या प्रश्नांसंदर्भात आयोजित लक्ष वेधीवरील चर्चेत सहभागी होत आमदार अस्लम शेख यांनी विकासकांकडून होणाऱ्या दिरंगाईचा मुद्दा उपस्थित केला.
अस्लम शेख म्हणाले की, काही विकासक पुनर्विकास प्रस्ताव जमा करुन दुसऱ्या विकासकांचा शोध सुरु करतात. प्रत्यक्षात मात्र काहीच काम करीत नाही. प्रस्ताव जमा करणं आणि प्रत्यक्षात मात्र काहीच काम न करण हाच उद्योग हे विकासक वर्षानुवर्षे करीत आलेले आहेत. या विकासकांनी १०-१० वर्ष पुनर्विकासाचे प्रकल्प रखडवले आहेत. अशा विकासकांना कायमस्वरुपी काळ्या यादीत टाकुन पुन्हा त्यांना कधीच पुनर्विकास प्रकल्पांसाठी पात्र न ठरवण्याची गरज आहे. तसेच कोळीवाडी व गावठणांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (SRA) प्रकल्प राबऊ नयेत असे सरकारचे धोरण आहे. मात्र कोळीवाडे व गावठणांना लागुनच असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना देखील स्थगिती देण्यात आलेली आहे. ही स्थगिती उठविणार का..? असा प्रश्नही अस्लम शेख यांनी उपस्थित केला.
अस्लम शेख यांनी केलेली सूचना निश्चितपणे चांगली आहे. या सूचनेचा विचार केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधीला उत्तर देताना दिली. तसेच ३१ कोळीवाडे व गावठणांचे सीमांकन झालेले आहे. कोळीवाड्यांच्या सीमांच्या आत कोणत्याही पुनर्विकास प्रकल्पांना नव्याने मान्यता देण्यात येणार नाही. कोळीवाडे व गावठणांसाठी नवीन डिसीआर बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली.