पोलीस ठाण्याबाहेर केलेल्या गोळीबार प्रकरणी आमदारांना त्वरित अटक करावी…

महाराष्ट्र

मुंबई: गेल्यावर्षी गणेश विसर्जनादरम्यान पोलीस ठाण्याबाहेर जमावाच्या दिशेने केलेल्या गोळीबार प्रकरणी घटनास्थळावरुन जप्त केलेले काडतुस हे आमदार सदा सरवणकर यांच्या जप्त केलेल्या परवानाधारक बंदूकीतील असल्याचे कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या बॅलेस्टिक अहवालातून सिद्ध झाले आहे त्यामुळे दोषी असलेल्या आ. सरवणकर यांना अटक करुन या गोळीबाराचा तपास जलद गतीने करण्यात यावा, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी स्वरुपात केली आहे.

२०२२ च्या विसर्जनादरम्यान पोलीस ठाण्याबाहेरील जमावाच्या दिशेने गोळी झाडल्याप्रकरणी सरवणकर व त्यांच्या इतर सहकाऱ्यांविरोधात आर्म्स कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करूनही सबळ पुराव्याअभावी अटक करण्यात आली नव्हती. मात्र आता प्रयोग शाळेने ती गोळी त्यांच्याच बंदुकीतून झाडल्याचा सबळ पुरावा सादर केला आहे. तरी देखील सरवणकर यांना अद्याप अटक करण्यात का आली नाही, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे. तसेच ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून पोलीसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण करणारी असल्याची दानवे यांनी म्हटले.

सदर घटनेतून काही अनुचित प्रकार घडला असता तर राज्यात कायदा व सुव्यस्थेची परिस्थिती निर्माण झाली असती. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज व प्रत्यदर्शीचा शोध घेऊन त्यांचा जवाब नोंद करण्यासाठी करण्यात येणारी दिरंगाई म्हणजे सदर गुन्ह्यांत पोलीस जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करत आहेत किंवा राजकीय दबावापोटी दोषींना अटक करण्यात टाळाटाळ करत आहे, असा संशय निर्माण झाल्याने दानवे यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

एखादे प्रकरण, घटना घडल्यावर शासन व मुंबई पोलिसांकडून त्वरित कारवाई होते ती या प्रकरणी होताना दिसत नाही. त्यामुळे फडणवीस यांनी स्वतः जातीने लक्ष घालून दोषींवर योग्य ती कलमे लावून त्वरित अटक करण्याचे आदेश देण्याची मागणी दानवे यांनी केली आहे.