सुनेत्रा पवारांचा शपथविधी म्हणजे भाजपचा मोठा डाव! बच्चू कडूंचा खळबळजनक आरोप

महाराष्ट्र

लातूर: प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. लातूर येथे प्रहारच्या जिल्हा परिषद उमेदवाराच्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी राष्ट्रवादीतील तीन बड्या नेत्यांवर थेट हल्लाबोल केला.

बच्चू कडू म्हणाले, “राष्ट्रवादीचे तीन बडे नेते जरी पक्षात असले, तरी ते भाजपच्या इशाऱ्यावर चालतात. कारण या तीनही नेत्यांच्या ईडीच्या फाईल भाजपकडे अडकल्या आहेत.” त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बच्चू कडू यांनी यालाच भाजपचा राजकीय डाव असल्याचा आरोप केला. “अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली सहानुभूती कमी करण्यासाठी भाजपाने हा डाव खेळला आहे. अंत्यविधीला चार दिवसही होत नाहीत, अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांनाही पुष्पगुच्छ घेऊन जायचं की सांत्वन करायला जायचं, असा प्रश्न पडतो,” असे ते म्हणाले.

माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू यांनी सुनेत्रा पवार यांना शुभेच्छाही दिल्या. “या दुःखाच्या काळात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणं हे एका अर्थाने धाडस आहे. या धाडसाच्या जोरावर त्यांनी सामान्य माणसाच्या पाठीशी ठामपणे उभं रहावं,” असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, २८ जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले होते. या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, शनिवारी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

यापूर्वीही बच्चू कडू यांनी अजित पवार यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. “अजितदादा हे धाडसी, स्पष्टवक्ते आणि कार्यकर्त्यांसाठी झटणारे नेते होते. त्यांच्या अचानक जाण्याने राज्याला मोठा धक्का बसला,” असे त्यांनी म्हटले होते.