आंदोलक शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनेच्या नेत्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलीसांवर कारवाई करा…

महाराष्ट्र

मुंबई: सोयाबीन व कापसाला दरवाढ मिळावी, यासह शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला होता. शांततेने, अहिंसक मार्गाने सुरु असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला. आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर आणि आदेश देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करत विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात आक्रमक झाले.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, अतिवृष्टीची नुकसान भरपाई, पीकविमा रक्कम इत्यादी शेतकऱ्यांना मिळण्यासाठी शेतकरी संघटनेमार्फत शांततेत आंदोलने केलेले आहे. राज्यातील शेतकऱ्यांनपैकी जवळपास 50 टक्के शेतकरी हा सोयाबीन उत्पादक आहे. देशाच्या सोयाबीनच्या उत्पादनापैकी जवळपास 40 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. साधारणत: सोयाबीन उत्पादनाचा प्रतीक्विंटल उत्पादन खर्च 5 हजार 783 रुपये आहे. सद्याचा बाजारभाव रु.5 हजार ते 5 हजार 500 या दरम्यानच आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाला दरवाढ मिळावी यासाठी त्यांचे आंदोलन होते. कापूस पिकालाही यावर्षी 8 हजार 184 रुपये उत्पादन खर्च आलेला आहे. तर सध्याच्या कापसाचा बाजारभाव 7 हजार 500 ते 8 हजार 500 दरम्यानच आहे. सातत्याने सोयाबीन व कापसाच्या भावात चढउतार होत आहे. उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांनसाठीचे हे आंदोलन होते.

या आंदोलनानंतर शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना स्थानबध्द करून त्यांना तातडीने दवाखान्यात नेले नाही. त्या ऐवजी त्यांचेसोबत आलेल्या शेतकऱ्यांवर बेछूटपणे लाठी हल्ला केला त्यामध्ये जेष्ठ नागरीक, महिला, लहान मुले यांचा समावेश होता. तसच तिथे वार्तांकन करणाऱ्या पत्रकार बांधवांनासुद्धा धक्का बुक्की करत मारहाण करण्यात आली एकंदरीत लाठी हल्ला हा पुर्व नियोजित कट होता. तुपकर यांना वैद्यकीय तपासणीसाठी दवाखान्यात दाखल केल्यानंतर अनेक विद्यमान व माजी विधानसभा सदस्यांना तुपकर यांना भेटू दिले नाही. सनदशीर मार्गाने होणारी आंदोलने दडपण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरु आहे. यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून अशी कृत्ये केली जात असून पोलीस अधिकाऱ्यांचे मदतीने त्यांचेवर गंभीर गुन्ह्यातील कलमे लावण्यात आली आहेत.यामध्ये पोलीस अधिकारी जाणूनबुजून त्यांना त्रास देत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.