मुंबई: येत्या एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात खासदारांचा कार्यकाळ संपत असून, या निवडणुकीकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे. संख्याबळ पाहता यंदाच्या राज्यसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फायदा होण्याची शक्यता असून, सातपैकी सहा जागा महायुतीच्या पारड्यात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागू शकते.
राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला ३७.५ मतांची आवश्यकता असते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशाचा थेट परिणाम आता राज्यसभा निवडणुकीवर होणार आहे. विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार भाजपाचे १३७, शिंदेसेनेचे ६० आणि राष्ट्रवादीचे ४१ आमदार आहेत. त्यामुळे भाजपाला चार, राष्ट्रवादीला एक आणि शिंदेसेनेला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडे केवळ एक जागा येऊ शकते.
दरम्यान, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रमुख शरद पवार यांची उमेदवारी महत्त्वाची ठरणार आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार भूमिका मांडली आहे. “शरद पवारांसारखा नेता दिल्लीत असणं महाराष्ट्रासाठी गरजेचं आहे. ते महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहेत. आमच्याकडे त्यांना निवडून आणण्याइतकी ताकद आहे. कुणाकडे हात पसरण्याची गरज नाही,” असे राऊत यांनी स्पष्ट केले. पवारांनी राज्यसभा निवडणुकीत उभे राहावे, हीच महाविकास आघाडीची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोणाचा कार्यकाळ संपणार?
महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एकूण १९ जागा असून, सध्या १२ जागा एनडीएकडे तर ७ जागा महाविकास आघाडीकडे आहेत. येत्या २ एप्रिल २०२६ रोजी शरद पवार आणि फौजिया खान (राष्ट्रवादी – शरद पवार गट), ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसच्या रजनी पाटील, भाजपाचे धैर्यशील पाटील व भागवत कराड तसेच रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांचा कार्यकाळ संपत आहे.महायुतीच्या वाढलेल्या ताकदीमुळे यावेळी राज्यसभेतील राजकीय गणिते बदलणार असून, शरद पवार राज्यसभेच्या रिंगणात उतरणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.