महाराष्ट्राचे पाच तुकडे करण्याचा गद्दारांचा डाव स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके

महाराष्ट्र

मुंबई: स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके हे धोरण घेऊन पुढे जाणाऱ्यांना विधानभवनाची पायरी चढू देणार नाही, त्यांनी माझं नाव आदित्य रश्मी उद्धव ठाकरे हे लक्षात ठेवावं, असा गर्भीत इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला. आज जालना जिल्ह्यातील रामनगर येथे आयोजित शिवसंवाद कार्यक्रमात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मिंदे सरकारला चांगलेच फटकारले. गद्दारांनी महाराष्ट्राचे पाच तुकडे करण्याची सुपारी घेतली असल्याचा डाव आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

हिंमत असेल तर राज्यपाल बदलून दाखवावा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी मिंदे सरकारला केले. उद्धव साहेब आणि मी पाठीवर ४० वार घेऊन लढतोय. शिवसेना आज विरोधात आहे, या आधीही विरोधात होती, मात्र ती जनतेच्या प्रश्नांसाठी लढत आहे. शिवसेनेचा जन्मच समाजसेवेसाठी आहे आणि आम्ही सत्तेसाठी नाही तर सत्यमेवसाठी आहोत, असं आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.

शिवसेना आणि ठाकरे संपवयाची सुपारी मुख्यमंत्री व गद्दारांनी घेतली, हे त्यांनी त्यांनी जाहीर करावं. मी वरळीतून किंवा ठाणे मतदारसंघातून आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढण्याचे आव्हान केले, मात्र मुख्यमंत्री म्हणतात मी छोटे आव्हान घेत नाही तर अजून मोठे आव्हान येऊ दे. मुख्यमंत्रीजी इतका अहंकार पण बरा नव्हे. आम्ही छोटी माणसं असलो तरी जनतेसाठी जनतेच्या मध्ये राहून काम करतो, असा टोला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री यांना लगावला.

सभा होऊ नये म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रयत्न करतात. याचवेळी मीडियानेच प्रसारित बातमीत वरळी मतदारसंघात कोळी बांधवांसाठी आयोजित कार्यक्रमात इलाहाबादचे कोळीबांधव दिसतात. तर त्या सभेत रिकाम्या खुर्च्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला, अशी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची सभेची खिल्ली उडवली.