स्वातंत्र्य सैनिकांना भेटण्यास सरकारकडे वेळ नसणे हे वेदनादायी…

राजकीय

मुंबई: स्वातंत्र्य सैनिकांना सन्मान हा मिळायलाच हवा, मात्र आज सत्ताधारी हे वेगवेगळ्या कामात गुंतले आहेत. त्यांना जनतेशी देणंघेणं नाही. त्यामुळे त्यांना गेल्या 3 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे पाल्य यांनाही भेटण्यासाठी वेळ नसणे हे वेदनादायी असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्य सैनिक तक्रार निवारण समितीचे पदाधिकारी व पाल्य विविध मागण्यांसाठी आझाद मैदान येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांची विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज आझाद मैदान येथे भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्य सैनिक तक्रार निवारण समितीच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असून या मागण्यांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करणार असल्याचा शब्द अंबादास दानवे यांनी उपोषणकर्त्या स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या पाल्यांना दिला. सरकारच्या वतीने मंत्री किंवा प्रतिनिधी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा करण्यासाठी आले असते तर आज त्यांना उपोषणाची वेळ आली नसती असा टोला दानवे यांनी विरोधकांना लगावला.

तुम्ही जर असमाधानी असलात तर शासनकर्ते सुद्धा समाधानी राहू शकत नाही, तुमचं समाधान व्हावं यासाठी सरकारने मागण्या मान्य केल्याच पाहिजे असे दानवे यांनी स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या पाल्यांना संबोधताना म्हटले. स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग हा विसरता येणार नाही,

आज आपण अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करत आहोत, हैद्राबाद संग्रामालाही यंदा 75 वर्ष पूर्ण होणार आहे. हे दोन्ही संग्राम महत्त्वाचे आहेत. ज्यांच्यामुळे आज स्वातंत्र्य मिळाला ते पारतंत्र्यात असताना, त्याचा उपभोग घेणारे समाधानी कसे राहू शकतात असा संतप्त सवाल दानवे यांनी उपस्थित केला.

केंद्र व राज्य सरकार त्यांचे कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांच्यासाठी विविध योजना जाहीर करताना त्याच अध्यादेश हे १ एप्रिल पासून लागू करतात, मग या स्वातंत्र्य सैनिकांची मंजूर झालेली गौरव पेन्शन योजना ही पूर्व लक्षी प्रभावीपणे जारी केल्याप्रमाणे का नाही? समितीची मागणी योग्य असल्याचे म्हणत ती मान्य करण्यासाठी सरकारची इच्छा शक्ती असणे आवश्यक असल्याचे दानवे म्हणाले.

यावेळी महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्य सैनिक तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष वसंतराव काकासाहेब देशमुख, बाळासाहेब चौंधे, शिवाजी साळुंके, दादाराव शिरसाठ, मारोती जाधव, स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे उपोषणकर्ते पाल्य उपस्थित होते.