सह्याद्री युवा मंचच्या मावळ्यांचा शिवजयंती निमित्त उपक्रम
शिक्रापूर (शेरखान शेख): पाण्याच्या थेंबाने तहानलेल्याची तृष्णा भागते तर रक्ताच्या थेंबाने मृत्यूच्या छायेतील माणसाची श्वसनसंस्थाच नाही तर संपूर्ण संस्था आणि आयुष्य वाचते या भावनेतून सह्याद्री युवा मंच 3 वर्षापासून शिवजयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबीर आयोजित करत असून या वर्षी तब्बल ३४१ रक्तदात्यांनी रक्तदानाचा उच्चांक गाठला आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथे शिवजयंतीच्या निमित्ताने सह्याद्री युवा मंच यांच्या पुढाकाराने बालाजी रक्तपेढी सातारा यांच्या माध्यमातून अष्टविनायक हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन अष्टविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. शरद लांडगे, पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर, राजेश माळी, विद्युत वितरणचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन, सहाय्यक अभियंता अशोक पाटील, ॲड. सारिका वाबळे, महेश शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना रक्तदान सारखे उपक्रम नागरिकांनी राबवणे गरजेचे असून त्याची समाजात गरज असल्याचे मत विद्युत वितरणचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांनी व्यक्त केले तर सह्याद्री युवा मंचचे कार्य कौतुकास्पद असल्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर यांनी सांगितले.
आयोजित रक्तदान शिबिरात महिलांनी देखील उस्फुर्त प्रतिसाद नोंदविला होता तर यावेळी तब्बल ३४१ पिशवी रक्त संकलित करत रक्तदात्यांनी उच्चांक गाठला असून सदर रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी सह्याद्री युवा मंचचे अध्यक्ष शशिकांत कानडे, जयदिप शिंदे, तुषार असवले, अभिजीत यादव, रोहन गायकवाड, धनाजी हरणे, कृष्णत शेवाळे, अरुण देसाई, अमोल झणझणे, सागर भोसले, सचिन शिंदे, चंद्रगुप्त मोरे, अमित शिंदे, अतुल मोरे, यशवंत गावडे, संभाजी थोरात, प्रविण कणसे यांसह आदींनी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान सह्याद्री युवा मंचचे अध्यक्ष शशिकांत कानडे यांनी सर्वांचे आभार मानले.