शिरूर(अरुणकुमार मोटे): “बिबट हा शत्रू नाही, जंगलाचा अविभाज्य घटक आहे” या संदेशासह शिरूर वनविभागाने बिबट प्रवण भागातील टाकळीहाजी, पिंपरखेड, चांडोह, जांबुत येथे विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित केले होता. माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे प्रोजेक्ट मॅनेजर महेंद्र ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमात तेथील मुलांना, पालकांना बिबट्याच्या जीवनशैली, स्वभाव, सवयी तसेच मानव–बिबट संघर्ष कमी करण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
उपवनसंरक्षक, जुन्नर प्रशांत खाडे,सहाय्यक वनसंरक्षक, जुन्नर स्मिता राजहंस,वनपरिक्षेत्र अधिकारी, शिरूर निळकंठ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मिळालेली माहिती घरी व परिसरातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले, जेणेकरून संघर्षाऐवजी सहजीवनाचा मार्ग खुला होईल.
गटाने चालणे व लहान मुलांना एकटे न सोडणे.
घराभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे, ऊसाची शेती टाळणे.
पाळीव जनावरे बंदिस्त गोठ्यात बांधणे.
रात्री टॉर्च, काठी व मोबाईलवर गाणी लावून बाहेर जाणे.
शाळेत शक्यतो समूहाने जाणे.
उघड्यावर झोपू नये.
बिबट्याचा पाठलाग न करणे आणि दिसल्यास त्वरित वनविभागाला कळवणे.या खबरदारीच्या महत्त्वाच्या सूचना बापूसाहेब गावडे विद्यालय टाकळी हाजी येथील विद्यार्थ्यांना व पालकांना देण्यात आल्या
या कार्यक्रमासाठी शमहेंद्र ढोरे यांच्यासोबत त्यांची टीम,वनपाल पिंपरखेड नितिन म्हात्रे,वनरक्षक, लहू केसकर, महेंद्र दाते आणि बेस कॅम्प पिंपरखेडचे रेस्क्यू मेंबर्स उपस्थित होते.शरदवाडी, जांबुत, चांडोह येथे घराघरामध्ये तसेच मेंढपाळ वाडा तसेच चांडोह येथील अखंड हरिनाम सप्ताह येथेही जनजागृती केली आहे.या जनजागृतीद्वारे शिरूर तालुक्यातील बेट भागामध्ये मानव–बिबट संघर्ष कमी होऊन सहजीवनाची वाटचाल वेगाने होईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.