शिरुरच्या बेट भागात टाकळी हाजी येथे दुध दरवाढीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन; शिवबा संघटनेचा आक्रमक पवित्रा

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) दुधाला किमान ४० ते ४५ रूपये दर मिळावा या मागणीसाठी टाकळी हाजी (ता.शिरुर) येथे शिवबा संघटनेकडून राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला शेतकरी संघटना, युवा क्रांती संघटना , राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष , हिंदुस्तान जनसेवा पक्ष, तसेच टाकळी हाजी, माळवाडी, म्हसे ग्रामपंचायत यांनीही पाठिंबा दिला.

 

यावेळी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालण्यात आला आणि रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. सरकारकडे उद्योजकांचे कर्ज माफ करण्यासाठी पैसा आहे मात्र शेतकऱ्यांच्या दुधाला हमीभाव देण्यासाठी नाही. या भागातील लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा विधानसभेत मांडावा अशी भावना यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली.

 

यावेळी भीमाशंकर कारखान्यांचे संचालक देवदत्त निकम, हिंदुस्थान जनसेवा पक्षाचे अध्यक्ष दिपक घोलप, निवृत्त सीईओ प्रभाकर गावडे, सरपंच अरुणा घोडे, उपसरपंच गोविंद गावडे, माजी सरपंच दामूशेठ घोडे, नाना फुलसुंदर, सोमनाथ भाकरे, रुपेश ढवण, अनिल शेटे, शंकर पिंगळे, अविनाश पोकळे, ओंकार जाधव तसेच शिवबा संघटनेचे पदाधिकारी, दुध उत्पादक शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

 

शिवरायांचे नाव घेवून राजकारण करणारे खरंच अनुकरण करतात का, करत असते तर आमच्या शेतमालाच्या देठाला धक्का लागला नसता. उद्योगपतींचे कर्जमाफी साठी पैसे आहेत, मात्र शेतकऱ्यांसाठी नाहीत. सरकारने जागे व्हावे अन्यथा याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसून येईल.

अनिल शेटे

(संस्थापक) शिवबा संघटना

 

दुधाची किटली शेतकऱ्याची पत वाढवते; निकम 

शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकण्यासाठी विठ्ठलाने सरकारला बुध्दी द्यावी. शेतकऱ्याला कोणत्याही दुकानात अडचण आली आणि उधारीवर खरेदी करायची असेल तर दुधाची किटली पाहून अडचण दूर होते. दुधाची किटली शेतकऱ्याची पत वाढवते. दुध पावडर आयात करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध तसेच शेतकऱ्यांसाठी मोठे आंदोलन छेडणार असून प्रसंगी जेल भोगायला तयार असल्याचे यावेळी बोलताना देवदत्त निकम यांनी सांगितले.

शिरुर; खासदार लंके यांच्या बहिणीने गरजु मुलांना शालेय साहित्य वाटप करत जपला सामाजिक वसा