शिरुर (तेजस फडके) : तुकडाबंदी अधिनियमात सुधारणा करून गुंठेवारी दस्त नोंदणी सुरू करण्याची राज्य सरकारची घोषणा होऊन अनेक महिने उलटले असले, तरीही प्रत्यक्षात नोंदणी प्रक्रिया सुरु न झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि असंतोष निर्माण झाला आहे. तात्काळ ‘वन डीस्ट्रिक्ट, वन रजिस्ट्रेशन’ची अंमलबजावणी करावी, अशी मागणी ॲड शरद तुकाराम बांदल यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
गुंठेवारी नोंदणी सुरू होईल या आशेवर अनेक लहान जमीनधारकांचे प्रश्न सुटतील, असे अपेक्षित असताना नोंदणी कार्यालयातून नागरिकांना अद्याप स्पष्ट माहिती मिळत नसल्याचे ॲड बांदल यांनी नमूद केले. “महिनोमहिने धावपळ करुनही नोंदणी प्रक्रिया सुरु नसल्याने नागरिकांचे प्रचंड नुकसान होत आहे,” असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
यासोबतच शासनाची ‘वन डीस्ट्रिक्ट, वन रजिस्ट्रेशन’ ही महत्वाकांक्षी योजना देखील अनेक ठिकाणी कागदावरच राहिल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. अनेक दुय्यम निबंधक कार्यालयांकडून जिल्ह्यातील कोणताही दस्त नोंदणीस नाकारला जात असल्याचे महसूल मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
या पार्श्वभूमीवर ॲड बांदल यांनी गुंठेवारी दस्त नोंदणीची तातडीने अंमलबजावणी करावी तसेच ‘वन डीस्ट्रिक्ट, वन रजिस्ट्रेशन’ योजनेचे काटेकोर पालन करण्यासाठी सर्व निबंधक कार्यालयांना स्पष्ट सूचना द्याव्यात, अशी मागणी केली आहे.
गुंठेवारी धारकांनो गुंठेवारी नियमित करून दंडात्मक कारवाई टाळा
तुकडेबंदी कायदा रद्द; आता 1, 2, 3 गुंठे जमिनीची विक्री कायदेशीर
तुकडेबंदी हरणार? सरकार आणणार नवा ‘गुंठेवारी कायदा’! जाणून घ्या सविस्तर माहिती
गुंठेवारीच्या परवानगीसाठी ‘या’ संकेतस्थळावर करा अर्ज, अर्जासाठी लागणार ‘ही’ ३ कागदपत्रे आवश्यक