शिंदोडी (तेजस फडके): गुनाट (ता. शिरुर) येथील चिंचणी-गुनाट रोडवर असणाऱ्या गुणवंतवाडी येथील सोमनाथ दत्तात्रेय गिरमकर या शेतकऱ्याच्या दोन मेंढ्यावर रविवार (दि १७) रोजी पहाटे २:३० च्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याने त्या मृत्यूमुखी पडल्या असुन या शेतकऱ्याचे सुमारे २५ हजारांचे नुकसान झाले आहे.
चासकमानचा कॅनॉल गुनाट येथुन जात असल्याने गावात जवळपास ८० टक्के उसाचे क्षेत्र झाले असुन या उसात कायम “बिबट्या” चे नागरिकांना दर्शन होत असते. अनेक ठिकाणी बिबट्याच्या पावलांचे ठसे शेतकऱ्यांना आढळतात परंतु वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना याबाबत संपर्क साधल्यास ते कधीच वेळेवर येत नाहीत. त्यामुळे बिबटया शेळ्या, मेंढ्या यांच्यावर हल्ले वाढत असताना वनविभागाकडुन दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची टाळाटाळ…?
शिरुरच्या पुर्व भागात नेमणुकीस असलेले वनविभागाचे कर्मचारी कधीच वेळेवर फोन उचलत नाहीत. तसेच गरजेच्या वेळेला त्यांचे फोन कायमच बंद असतात. एखाद्या ठिकाणी बिबटयाचे ठसे आढळल्यास त्या जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी न करता ते शेतकऱ्यांनाच फोटो काढुन पाठवायला सांगतात त्यामुळे हे कर्मचारी नक्की पगार कशाचा घेतात असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.