न्हावरे (तेजस फडके): शिरुर तालुक्यात एक घोडगंगा सहकारी साखर कारखाना असताना आणि अशोक पवार स्वतःच त्या कारखान्याचे अध्यक्ष असताना तालुक्यातच दुसरा खाजगी साखर कारखाना काढण्याच पाप आमदार अशोक पवार यांनी केल असुन घोडगंगा साखर कारखाना म्हणजे राजकारणाचा अड्डाच झाला आहे. त्यांचा स्वतःचा खाजगी कारखाना नफ्यासाठी चालवता आणि घोडगंगा साखर कारखान्यातील कामगारांना मात्र पाच महिने पगार दिला जात नाही हि वस्तुस्थिती असल्याची टिका दादा पाटील फराटे यांनी केली.
शुक्रवार (दि 28) रोजी न्हावरे येथे ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिरात सायंकाळी 7 च्या सुमारास सर्व उमेदवारांनी दर्शन घेतले. तसेच 51 महिलांच्या हस्ते नारळ फोडून घोडगंगा किसान क्रांती पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अध्यक्ष म्हणून घोडगंगा कारखान्याच्या उभारणीत मोलाचा वाटा असणारे संस्थापक सदस्य माऊली काळे अध्यक्षस्थानी होते.
यावेळी बोलताना फराटे पुढ म्हणाले, गेली 25 वर्ष मी घोडगंगा कारखान्याला ऊस घालतो. म्हणूनच मला हा कारखाना आणि सभासदांविषयी तळमळ आहे. मी कारखान्याच्या 10 वर्ष उपाध्यक्ष होतो. त्या काळात कारखान्याला अनेक पुरस्कार मिळत होते. परंतु आता मात्र कारखान्याची अवस्था बिकट झाली असुन याला सर्वस्वी अशोक पवार जबाबदार आहेत. तालुक्यातील इतर संस्था अशोक पवारांच्या नेतृत्वाखाली चांगल्या चालतात असं तिथले पदाधिकारी सांगतात. मग 25 वर्ष साखर कारखाना तुमच्याच ताब्यात असताना त्याला आज जप्तीची नोटीस कशी आली याच उत्तर द्या…? असा सवाल दादापाटील फराटे यांनी केला.
यावेळी बोलताना अॅड सुरेश पलांडे म्हणाले, अशोक पवार यांच्याकडे गेली 25 वर्ष एकहाती सत्ता असतानाही कारखान्याच विस्तारीकरण झालं नाही. तसेच याच कारखान्याच्या कार्यक्षेत्रात त्यांनी स्वतःचा खाजगी कारखाना काढला. 25 वर्षात निवडून गेलेल्या 100 संचालकापैकी एकाला तरी स्वतःच्या मर्जीनुसार काम करता आलं का…? आपल्याला डोईजड झालेल्या माणसाला जमिनीवर आणण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. अशोक पवार म्हणतात माझा व्यंकटेशशी काहीच संबंध नाही तर मग व्यंकटेशच्या गाळपासाठी तुम्ही पत्नी, मुलगा आणि मुलीच्या नावे 100 कोटी रुपयांच कर्ज का काढलं…? असा प्रश्न यावेळी पलांडे यांनी विचारला.