शिरूर (तेजस फडके): नागरगाव (ता. शिरुर) येथील भीमा नदी पात्रात गुरुवारी (ता. १४) सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान येथील मासेमारी व्यवसाय करणारे गृहस्थ नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे. लक्ष्मण गोविंद जाधव (वय ५२) असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
जाधव हे सायंकाळच्या सुमारास भीमा नदी पात्रात मासेमारी करण्यासाठी गेले होते. भीमा नदी पात्रातील पुराच्या पाण्याच्या अंदाज न आल्यामुळे पाण्यात तोल जाऊन ते पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती गाव कामगार तलाठी सतीश पलांडे यांनी दिली. गुरुवारी रात्री उशिरा पर्यंत सदर व्यक्तीला शोधण्याचे काम ग्रामस्थांकडून सुरू होते पण त्यात यश आले नाही. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
नागरगाव येथून जाधव नदीपात्रात वाहून गेल्याची माहिती शिरूर तहसीलदार यांना कळविल्यानंतर त्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांना याबाबत कळविले असून, एनडीएआरएफ म्हणजेच शोध पथक यंत्रणेला पाचारण करावे असा दूरध्वनी संदेश केला आहे. शोध पथक नागरगाव या ठिकाणी रात्री उशिरा पर्यंत दाखल झालेले नव्हते. जाधव हे पाण्याचा अंदाज न आल्यामुळे वाहून गेले आहे. त्यामुळे शिरूर तालुक्यातील पुराच्या पाण्यात नागरगाव येथे पहिला बळी गेल्याचे बोलले जात आहे.
नदीचे पाणी सातत्याने वाढत असून नागरिकांनी नदीकाठी पाण्याच्या महापुरात जाण्याचा प्रयत्न करु नये. प्रशासन यंत्रणा नदी काठी कार्यान्वित करावी असे आवाहन करण्यात आले आहे. नागरगाव येथे गरुवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान येथील एक मासेमारी करणारी व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहुन गेलेली असताना १४ तास उलटुन गेले तरीही आपत्ती व्यवस्थापनची (बचाव पथक) टिम १० वाजेपर्यंत घटनास्थळी दाखल झालेली नव्हती. त्यामुळे नागरगाव ग्रामस्थानी संताप व्यक्त केला आहे.