शिक्रापूर: पावसाळा सुरु झालेला असताना सापांच्या प्रजननाचा काळ सुरु झालेला असतो तसेच यावेळी सापांच्या बिळात पाणी गेल्याने अनेक साप निदर्शनास येत असल्याने सर्पदंशाचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी सापांपासून सावध रहावे असे आवाहन इंडिया बुक रेकॉर्डचे सर्पमित्र शेरखान शेख यांनी केले आहे.
पावसाळा सुरु होत असताना अनेक ठिकाणी सापांच्या बिळांमध्ये पाणी जाऊन साप निदर्शनास येतात तर या दरम्यान सापांच्या प्रजननाचा काळ असल्याने घोणस व नाग या विषारी सापांची पिल्ले मोठ्या प्रमाणात आढळून येतात. शक्यतो सदर पिल्ले कोठेतरी आडोसा घेऊन बसलेली असल्यामुळे शेतात सुद्धा निदर्शनास येतात व शेतात काम करताना सर्पदंश होत असतो.
त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात काम करताना पायात बुटाचा तसेच हातात ग्लोजचा वापर करावा तसेच सर्वत्र नागरिकांनी घराशेजारी असलेली जागा स्वच्छ ठेवावी, घराच्या आजूबाजूच्या परिसरात असलेले विटांचे, दगडांचे ढीग काढून टाकून, सापांपासून सावध राहून कोठेही साप निदर्शनास आल्यास वनविभाग अथवा जवळील सर्पमित्राला माहिती द्यावी, दुर्दैवाने कोणाला सर्पदंश झाल्यास त्यावर कोणताही उपाय ण करता तातडीने जवळील शासकीय रुग्णालयात सदर व्यक्तीला घेऊन जावे असे देखील आवाहन इंडिया बुक रेकॉर्डचे सर्पमित्र शेरखान शेख यांनी केले आहे.