कांदा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अंबादास दानवेंनी मांडली सभागृहात आक्रमक भूमिका

महाराष्ट्र

मुंबई: राज्यातील कांदा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळाला पाहिजे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडविले गेले पाहिजे, यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेत २८९ अनव्ये सर्व कामकाज बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी लावून धरली.

बार्शीतील कांदा उत्पादक शेतकऱ्याला दोन रुपये चेक दिल्याची बाब दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. पाकिस्तान, कझाकिस्तान,तुर्कीस्तान, नेदरलँड आदी देशांत व आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याची कमतरता मोठया प्रमाणात आहे. मात्र राज्यातील कांदा उत्पादक हमीभाव न मिळाल्यामुळे शेतावर नांगर फिरवत आहे. त्यामुळे कांदा निर्यात करण्यासाठी सरकारने पावले उचलावी व नाफेड मार्फत कांदा खरेदी करावा, अशी मागणी दानवे यांनी केली.

अमरावतीत सोमवारी शेतकऱ्यांवर झालेला लाठीचार्ज प्रकरण ही दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणला. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप दानवे यांनी करत शेतकरी गुन्हेगार, दहशतवादी आहेत का? त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातोय असा सवाल उपस्थित केला.

ऑस्ट्रेलियातून कापूस आयात करून सरकार राज्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. १२ ते १४ हजार कापसाला भाव मिळत होता, मात्र आता ७ ते ७.५ हजार इतका भाव खाली आला आहे. कापसाला हमी भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवून ठेवला, मात्र आता त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.

यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कांद्याची स्थिती योग्य असल्याचे मान्य केले. नाफेडमार्फत कोणत्याही अटी व शर्तीशिवाय कांदा खरेदी केला जाईल व याबाबत केंद्र सरकारकडे चर्चा केली जाईल, असे त्यांनी म्हटले.