महाराष्ट्र कृषीसेवा मुख्य परीक्षेला स्थगिती दयावी अंबादास दानवेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र…

महाराष्ट्र

मुंबई: गेल्या २१ दिवसांपासून कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची दखल घेत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून महाराष्ट्र कृषीसेवा मुख्य परीक्षेला तात्काळ स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त परिक्षांतर्गत होणाऱ्या कृषी सेवा मुख्य परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम (दि. ११) फेब्रुवारी २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला आहे. या नवीन अभ्यासक्रमामुळे कृषी अभियांत्रिकी शाखेच्या पदवीधर उमेदवारांचे नुकसान होत असून त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे (दि. २५) जानेवारी २०२३ पासून महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठात धरणे आंदोलन सुरु आहे.

महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा (निकाल) मुलाखत २०२१ व महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा २०२२ ला स्थगिती ला स्थगिती मिळावी. मृद व जलसंधारण विभागात कृषी अभियांत्रिकी पदवीच्या विद्यार्थ्यांना पात्र करुन कृषी अभियंत्यांची तात्काळ भरती प्रक्रिया राबवावी. राज्यासाठी स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करावे आदी महाराष्ट्र राज्य कृषी अभियांत्रिकी संघटनेच्या वरील मागण्यांचा सहानभूतीपूर्वक विचार करुन न्याय द्यावा, असे दानवे यांनी पत्रात म्हटले आहे.