Kolhapur Bull

खिलारी बैलांचा मृत्यू झाल्याचे पाहून मालक ढसाढसा रडला…

महाराष्ट्र

कोल्हापूर : एक शेतकरी मशागतीची कामे आवरून बैलगाडीने घराकडे चालले असताना कालव्याच्या काठावर आल्यावर अचानकपणे बैल घाबरल्याने बैलगाडी कालव्यात पडली. या घटनेत दोन्ही खिल्लारी बैलांचा मृत्यू झाला आहे. बैलांकडे पाहून मालक ढसाढसा रडल्यामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

कागल तालुक्यातील वाळवे खुर्द येथे ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. कालव्यात पडून शेतकरी दिलीप खुटाळे यांच्या दोन बैलांचा मृत्यू झाला आहे. दिलीप खुटाळे हे शेतातील मशागतीची कामे आवरून बैलगाडीने घराकडे चालले होते. कालव्याच्या काठावर आल्यावर अचानकपणे बैल घाबरल्याने दिलीप खुटाळे यांच्यासह बैलगाडी कालव्यात पडली. बैलांच्या गळ्यात बैलगाडीचे जू असल्यामुळे त्यांना पाण्यात हालचाल करता आली नाही. त्यामुळे पाण्यात बूडून दोन्ही बैलांचा मृत्यू झाला आहे.

दिलीप खुटाळे हे स्वतः वाचले पण आपल्या या लाडक्या खिल्लारी जोडीला वाचवू शकले नाही. कालव्यातून बाहेर आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. नागरिकांना बोलावून बैलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण, कालव्यात गुदमरून बैलांचा मृत्यू झाला होता. दोन्हीही खिल्लारी बैलांचा मृत्यू झाल्यामुळे दिलीप खुटाळे यांना घटनास्थळावरच रडू कोसळले.

या दोन्ही बैलांच्या मृत्यूमुळे त्यांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे खुटाळे या गरीब शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे गावकरीही हळहळले होते. या गरिब शेतकऱ्याला शासनाने नुकसान भरपाई देवून शेतकऱ्याला हातभार लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Video: नवा खिलारी बैल सापडला मगरींच्या तावडीत; चार तास थरार…