मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात एकाच वेळी अनेक घडामोडींनी वेग घेतला आहे. शिंदे गटातील तडकाफडकी राजीनामा, भाजपातील उफाळलेली गटबाजी, ठाकरे गटातील नगरसेवकांवरील कारवाईची शक्यता, तसेच टिपू सुलतान वादावरून आरोप-प्रत्यारोप… या सर्व घटनांनी राजकीय वातावरण तापले आहे.
शिंदेंच्या शिलेदाराचा तडकाफडकी राजीनामा
सिंधुदुर्ग येथील शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनंतर पक्षात नाराजी वाढल्याची चर्चा सुरू असतानाच हा निर्णय घेतला गेला.
वालावलकर यांनी “कोणावरही रोष नाही, पण काही गोष्टी मनाला लागल्या,” असे म्हणत आपण पुढे शिवसैनिक म्हणून काम करणार असल्याचे स्पष्ट केले. राजीनामा देताना ते भावूक झाल्याचेही सांगितले जाते. ते माजी मंत्री दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय मानले जातात. सध्या शिंदे गटाकडून त्यांची मनधरणी सुरू असून ते निर्णय मागे घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चंद्रपुरात भाजपात उफाळली गटबाजी
काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या चंद्रपूर महापालिकेत भाजपाने सत्तास्थापन केल्यानंतर महापौरपदी संगीता खांडेकर यांची निवड झाली. मात्र त्यानंतर पक्षातील दोन गटांतील वाद चव्हाट्यावर आले आहेत.
माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील मतभेदांमुळे कार्यकर्त्यांत नाराजी वाढली आहे. काही पदाधिकाऱ्यांनी जोरगेवार यांच्या कार्यक्रमांना बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. सोशल मीडियावरही आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असून जिल्ह्यात भाजपाची प्रतिमा मलिन होत असल्याची चर्चा आहे.
ठाकरे गटाचे तीन नगरसेवक अडचणीत?
कल्याण-डोंबिवलीतील ठाकरे गटाचे नगरसेवक राहुल कोट, स्वप्नाली केणे आणि मधुर म्हात्रे हे निवडणुकीनंतर अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. नंतर त्यांनी नवी मुंबईत स्वतंत्र नोंदणी केल्याने पक्षात खळबळ उडाली.
मशाल चिन्हावर निवडून येऊनही पक्षाच्या भूमिकेला समर्थन न दिल्याचा आरोप करत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधित प्रभागात पोटनिवडणूक घेऊन पुन्हा नगरसेवक निवडून आणण्याची तयारीही ठाकरे गटाने दर्शवली आहे.
टिपू सुलतान वादावरून फडणवीसांचा संताप
मालेगावमध्ये उपमहापौरांनी दालनात टिपू सुलतानचा फोटो लावल्यानंतर निर्माण झालेल्या वादाला नवे वळण मिळाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.
फडणवीसांनी “मतांसाठी इतिहासाचा विपर्यास सहन केला जाणार नाही,” असा इशारा देत काँग्रेसवर टीका केली आहे. या वक्तव्यामुळे राज्यात नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.
गणेश नाईक यांची शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका?
नवी मुंबईतील भूखंड वाटपाच्या मुद्द्यावरून वनमंत्री गणेश नाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली. “जनतेच्या प्रश्नांवर बोलू शकलो नाही तर मंत्रिपद काय कामाचे?” असा सवाल करत त्यांनी नगरविकास खात्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील खात्याकडे बोट दाखवत काही भूखंड खासगी विकासकांच्या फायद्यासाठी वळवले गेल्याचा आरोप त्यांनी केला. मंत्रिमंडळातीलच सदस्याकडून अशा प्रकारची टीका झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.राज्यातील या सलग घडामोडींमुळे सत्ताधारी व विरोधक दोघांमध्येही अस्वस्थता वाढली आहे. येत्या काही दिवसांत या वादांना कोणते राजकीय वळण मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.