आदरणीय अजित पवारांचा लोकाभिमुख वारसा पुढे नेण्यास सज्ज; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

महाराष्ट्र

मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आदरणीय अजित पवारांचा लोकाभिमुख वारसा पुढे नेण्याचे ठरवले आहे. शेतकरी, महिला, युवक आणि समाजातील वंचित घटकांसाठी आयुष्यभर कार्य केलेल्या दादांच्या विचारांवर टिकून राहून त्यांनी महाराष्ट्राच्या सेवेसाठी स्वतःला सज्ज केले असल्याचे त्यांनी सांगितले.

सुनेत्रा पवार म्हणाल्या, “दादांच्या अकाली निधनाने वैयक्तिक आयुष्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र त्यांनी दिलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रती प्रामाणिक बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, दादांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी ते प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि लोकाभिमुखतेने काम करतील. शेतकऱ्यांच्या हितासाठी, युवकांच्या संधींसाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी हे त्यांचे सर्वोच्च प्राधान्य असेल.

सुनेत्रा पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेला बळ देण्यास तसेच देशाचे गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यास राज्य सरकार तत्पर राहणार असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साथीने सामाजिक समता, आर्थिक प्रगती आणि सर्वसमावेशक समृद्धी साधण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुन्हा एकदा जनतेचे आणि सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानले आणि पक्षातील विश्वासास पात्र ठरण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करण्याचे आश्वासन दिले.