मुंबई: लहान आणि मध्यम शहरांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा, पायाभूत सुविधा मजबूत करणारा आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना मोठे प्रोत्साहन देणारा हा केंद्रीय अर्थसंकल्प देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्राला नवे बळ देणारा ठरेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत या स्वप्नाच्या दिशेने निर्धारपूर्वक पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प असून आत्मनिर्भर भारताकडे झेप घेणारा हा नववा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन केले.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जागतिक पातळीवर अनेक देशांच्या अर्थव्यवस्था अडचणीत असताना भारताने आपला विकासदर कायम ठेवला आहे. आर्थिक विकास, सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणे आणि सबका साथ, सबका विकास या तीन कर्तव्यांभोवती हा अर्थसंकल्प रचण्यात आला असून त्यात वर्तमानाचे भान आणि भविष्याची स्पष्ट दिशा दिसते.
मुंबई–महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या घोषणा
मुंबईतील मनोरंजन आणि करमणूक उद्योगाची जागतिक ओळख लक्षात घेऊन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी उभारण्याची घोषणा अत्यंत महत्त्वाची आहे. टायर-२ आणि टायर-३ शहरांच्या क्षमतांचा विचार करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात आलेल्या घोषणांमुळे राज्यातील शहरी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
पाच लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी १२ लाख कोटी रुपयांचा शहरी विकास निधी आणि महापालिकांच्या बाँड्ससाठी प्रत्येकी १०० कोटी रुपयांची सवलत देण्याचा निर्णय राज्यातील महानगरपालिकांना बळकट करणारा ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
उद्योग, रेल्वे आणि आरोग्य क्षेत्राला चालना
सूक्ष्म व मध्यम उद्योगांसाठी जाहीर केलेल्या योजनांचा महाराष्ट्रातील उत्पादन उद्योगांना मोठा लाभ होईल. सेमीकंडक्टरसाठी ४० हजार कोटी, बायोफार्मासाठी १० हजार कोटी, वस्त्रोद्योग, कंटेनर उत्पादन, डेटा सेंटरसाठी सवलती — या सर्व घोषणांचा फायदा महाराष्ट्राला निश्चितपणे होणार आहे.मुंबई–पुणे आणि पुणे–हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर, तसेच मेडिकल हब्सच्या उभारणीमुळे राज्यात रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळेल, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
महिला, आरोग्य आणि करदात्यांना दिलासा
महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी लखपती दीदी आणि शी-मार्टसारख्या योजनांमुळे महिलांना उद्योजकतेची संधी मिळेल. प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी हॉस्टेल उभारण्याचा निर्णय शिक्षणासाठी मोठे बळ देणारा आहे. दुर्धर आजारावरील औषधांच्या आयात शुल्कात कपात झाल्यामुळे हजारो रुग्णांना दिलासा मिळेल.१ एप्रिलपासून लागू होणारी नवीन, सुलभ आयकर प्रणाली सर्व करदात्यांना फायदेशीर ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जागतिक अस्थिरतेच्या काळात आत्मनिर्भरतेचा स्पष्ट संदेश देणारा हा अर्थसंकल्प असून, विकसित भारतासाठी सांगितलेली तीन कर्तव्ये देशाच्या प्रगतीला मार्गदर्शक ठरणार आहेत. या यशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीला संपूर्ण श्रेय दिले पाहिजे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.