शिरुर (तेजस फडके) सध्या सगळीकडे लोकसभेची रणधुमाळी चालु झाली असुन इच्छुक उमेदवार सध्या मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात व्यस्त आहेत. मतदारांच्या गाठीभेटी घेताना इच्छुक उमेदवार पायाला भिंगरी लावत सगळा मतदार संघ पिंजुन काढत आहेत. निवडुन आल्यानंतर ‘अपना काम बनता फिर भाड मे जाय जनता’ या उक्तीप्रमाणे मतदार संघात परत ढुंकूनही न पाहणाऱ्या अनेक उमेदवारांचे सध्या ‘मिरची भाकरी पासुन ते टपरीवर चायनीय’ खातानाचे व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यामुळे ‘वोट के लिये साला कुछ भी करेगा’ या वाक्याचा प्रत्यय मतदारांना येत आहे.
गेले साडेचार वर्षे शिरुर मतदार संघात ढुंकूनही न पाहणारे आणि ‘सायलेंट मोडवर’ असलेले शिरुरचे विद्यमान खासदार डॉ अमोल कोल्हे हे गेल्या सहा महिन्यांपासुन अचानक ‘ऍक्टिव्ह मोड’ मध्ये आले आहेत. तसेच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिरुर लोकसभा मतदार संघात विविध विकास कामांसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातुन निधी उपलब्ध करुन दिला आहे. परंतु सध्या आढळराव पाटील यांनी शिवसेनेची (शिंदे गट) साथ सोडत राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याने उद्धव ठाकरेंची साथ सोडुन आढळरावांच्या मागे शिंदे गटात गेलेल्या कार्यकर्त्यांना सध्या मात्र ‘विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती’ अशीच म्हणायची वेळ आली आहे.
सध्या सोशल मिडीयावर सगळ्याच उमेदवारांनी मोठया प्रमाणात प्रचारात आघाडी घेतली असुन निवडुन आल्यानंतर एरव्ही मतदारांकडे पाठ फिरवत आलिशान गाडीतून फिरणारे राजकीय नेते सध्या एखाद्या कसलेल्या अभिनेत्यालाही मागे टाकतील असे वागत आहेत. कुणी शेतकरी महिलेच्या हातुन मिरची-भाकरी तर कुणी साध्या टपरीवर चायनीय खातानाचे व्हिडिओ सोशल मिडीयावर टाकत आपण कसे सर्वसामान्य जनतेचे कैवारी आहोत याचा दिखावा करत आहेत. त्यामुळे सुज्ञ मतदारांनी आता मतदानातुनच या राजकीय पुढाऱ्यांना धडा शिकविण्याची वेळ आली असल्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे.
शिरुर; चिमुकलीच्या मृत्यूस कारणीभुत ठरल्याने कारचालकास एक वर्षाचा कारावास