Video: सणसवाडीत औद्योगिक वसाहतीमधील कंपनीला भीषण आग

मुख्य बातम्या शिरूर तालुका

आगीमध्ये तब्बल दोन कोटींचे नुकसान, दोन तासाने आग आटोक्यात

शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) येथील श्रीनाथ प्लास्टिक या कंपनीला (दि. १०) जुलै रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास भिषण आग लागल्याची घटना घडली असून तब्बल २ तासांच्या अथक परिश्रमानंतर स्थानिक नागरिकांसह अग्निशामक दलाच्या तीन पथकांच्या प्रयत्नाने आग विजवण्यात यश आले असून सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नाही. मात्र कंपनीचे तब्बल २ कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील एल & टी फाटा परिसरातील श्रीनाथ प्लास्टिक कंपनीमधील कामगार कंपनीत काम करत असताना वेल्डिंगचे काम सुरु असलेल्या ठिकाणी अचानकपणे आग लागली आणि आगीने रौद्र रुप धारण केले. यावेळी सर्व कामगार आरडाओरडा करत कंपनीच्या बाहेर पळाले काही वेळात आगीने मोठा पेट घेतला अन आगीचा धूर दोन किलोमीटर अंतरावरुन दिसू लागला. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, रणजीत पठारे, पोलीस हवालदार शंकर साळुंके, संदीप कारंडे, पोलीस शिपाई अमोल रासकर, शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, सणसवाडीचे उपसरपंच सागर दरेकर, पोलीस मित्र पप्पू सासवडे यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेत पाण्याच्या मदतीने आग विजवण्याचा प्रयत्न सुरु केला.

unique international school
unique international school

दरम्यान कंपनीमधील सिलेंडर तसेच शेजारी असलेल्या विद्युत रोहीत्राचे स्पोट झाले. काही वेळात रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील अग्निशामक दलाचे अधिकारी प्रदीप पावणे, भाऊसाहेब बागुल, बाळू पवार, सचिन मिसाळ, शुभम यादव तसेच पुणे महानगर विकास प्राधिकरणच्या अग्निशामक दलाचे विजय महाजन, संदीप शेळके, नितीन माने, मयूर गोसावी, चेतन खमसे, उमेश फाळके, विकास पालवे, अभिजित दराडे, संदीप तांबे, ओम पाटील, प्रशांत अडसूळ यांचे दोन पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विजाविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले. दरम्यान पोलीस मित्र पप्पू सासवडे यांनी पाण्याचे टँकर उपलब्ध करुन दिले. तब्बल २ तासांच्या अथक परिश्रमानंतर सदर ठिकाणची आग आटोक्यात आली. मात्र आगीमध्ये कंपनीतील सर्व मशिनरी तसेच साहित्य जळून खाक झाल्याने तब्बल दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

औद्योगिक वसाहतच्या ठिकाणी अग्निशामक यंत्रणा उभारावी…
शिक्रापूर सह परिसरात सणसवाडी, कोरेगाव भीमा, तळेगाव ढमढेरे, पिंपळे जगताप यांसह आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत असून अनेकदा येथे आगीच्या घटना घडत आहेत. परंतु घटना घडल्यानंतर अग्निशामक यंत्रणा रांजणगाव अथवा वाघोली येथून येई पर्यंत वाट पहावी लागते. त्यामुळे आगीचे व नुकसानीचे प्रमाण वाढते. त्यामुळे शासनाने औद्योगिक वसाहतीच्या ठिकाणी अग्निशामक यंत्रणा उभारावी, अशी मागणी शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, सणसवाडीचे उपसरपंच सागर दरेकर यांनी केली आहे.