भटक्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या शिवाजी शिंदेंची कहाणी

शिरूर तालुका
आश्रम शाळेत घडलेला व्यक्ती घडवतोय पंचवीस अनाथ मुले
शिक्रापूर (शेरखान शेख): भटकंती करणाऱ्या कुटुंबात जन्म झाल्याने आई वडिलांची नेहमीची भटकंती मात्र शिकण्याची इच्छा असल्याने आश्रम शाळेत शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभा असताना आपल्या प्रमाणेच काही विद्यार्थी घडावे या हेतूने शिवाजी अर्जुन शिंदे हे अनाथ व भटकंती करणाऱ्या 25 मुलांना एकत्र करुन त्यांना घडविण्याचे कार्य करत आहे.
कासारी फाटा (ता. शिरुर) येथे गुरुकुल वसतिगृह चालवणारे शिवाजी शिंदे यांचा जन्म दौंड तालुक्यात भटकंती करत उपजीविका करणाऱ्या नाथपंथी गोसावी समाजात झाला. आई वडिलांसह पूर्वजांची नेहमीची भटकंती मात्र शिवाजी यांची शिक्षणाची इच्छा त्यामुळे त्यांना यवत येथील जागृती आश्रम शाळेत दाखल करण्यात आले तेथे त्यांनी शिक्षण सुरु केले.
दहावीच्या वेळी उंब्रज सातारा येथे शिक्षण घेत दहावीत प्रथम क्रमांक मिळवला. त्यावेळी पेपर मध्ये नाव आले अन आपण काहीतरी करायचेच हे ध्येय त्यांनी निच्छित केले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी खर्च करायचा कसा हा प्रश्न समोर त्यामुळे त्यांनी हॉटेल, बेंजो पार्टीत, शेतात मिळेल ते काम सुरु करत शिक्षण घेत बारावी पूर्ण केली. कालांतराने विवाह झाला नोकरी काही मिळेना त्यामुळे त्यांनी रांजणगाव औद्योगिक वसाहतीत अवघ्या साडेतीन हजारात सुरक्षारक्षकाची नोकरी सुरु केली.
आपण भटकंती करणाऱ्या कुटुंबातून पुढे येऊन काहीतरी करुन दाखवायचे हे त्यांचे स्वप्न सुरक्षारक्षकाचे काम करताना अचानक बारावी उत्तीर्णांसाठी कंपनी मध्ये नोकरीची संधी आली अन शिवाजी रांजणगाव येथील ITC कंपनीत नोकरी करु लागले. आपल्या समाजात कोणाचे शिक्षण नाही, नेहमी भटकंतीच त्यामुळे आपण मुलांना शिक्षण द्यावे, असे त्यांना वाटू लागले त्यामुळे त्यांनी पत्नी सावित्रा यांना सांगितले.
आपल्याला शक्य होईल का पहा मी तुमच्या सोबत आहे असे सावित्राने सांगितले. त्यामुळे शिवाजी यांनी आपल्या काही नातेवाईकांना सांगत घरातील दागिने मोडून, कंपनीचा फंड काढून काही कर्ज काढून कासारी फाटा येथील 2 गुंठे जमीन घेतली तेथे घर बांधत आशिर्वाद ट्रस्ट स्थापन करत डिसेंबर २०२१ मध्ये गुरुकुल वसतिगृह सुरु केले. त्यांनतर अनाथ तसेच भटकंती करणाऱ्या समाजातील मुलांचा शोध घेत त्यांना येथे निवारा देत शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य सुरु केले.
सध्या बीड, काष्टी, जालना, यवत, भिगवण येथील उसतोड कामगारांसह भटक्या समाजातील तब्बल पंचवीस विद्यार्थी राहत असून परिसरातील शाळेंमधून त्यांना शिक्षण दिले जात आहे. तर या विद्यार्थ्यांमधून पुढील काळात नक्कीच काही अधिकारी घडतील असा शिवाजी शिंदे व त्यांची पत्नी सावित्रा शिंदे यांचा विश्वास आहे.
वसतिगृहासोबत परिसरातील 100 जणांचा पालक होण्याचा संकल्प…
शिवाजी शिंदे हे येथे 25 विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा देत शिक्षणाच्या प्रवाहात आणत असताना आपल्या परिसरातील अनाथ, निराधार तसेच शैक्षणिक अडचणीत असणाऱ्या 100 मुलांचे पालकत्व घेऊन शंभर मुलांचा पालक होण्याचा संकल्प शिवाजी शिंदे यांचा यापुढील काळात आहे.
युवा पिढीने आधार देण्याची गरज: दत्ता कवाद (सामाजिक कार्यकर्ते)
सध्याच्या काळात युवा पिढी वाढदिवसच्या निमित्ताने अनाठायी खर्च करत असल्याचे दिसते. मात्र युवा पुढीने अनाठायी खर्च टाळून अशा वसतिगृहांना मदतीचा हात दिल्यास त्यांना मोठा आधार उपलब्ध होऊ शकतो, असे मत सामाजिक कार्यकर्ते दत्ता कवाद यांनी सांगितले.