शिरुर तालुक्यात विजेचा करंट लागून आठ मेढयांचा मृत्यू

शिरूर तालुका

सुदैवाने मेंढपाळ व त्याची आजी बचावली

सविंदणे: आण्णापूर (ता. शिरुर) या गावात विद्युत तार तुटल्यामुळे आणि बेकायदेशीर आकड्यामुळे वायर मधून विद्युत प्रवाह जमिनीत उतरल्यामुळे अतिशय दुर्दैवी घटना घडली असून यात मेंढपाळाच्या जवळपास ७ ते ८ मेंढयांचा मृत्यू झाला आहे. अविनाश माळी रा. आण्णापूर या मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने अविनाश व त्याची आजी इंदूबाई माळी यांचा विजेच्या करंटने लांब फेकल्याने दैव बलवत्तर म्हणूण जीव वाचला आहे.

विद्युत तार तुटल्यामुळे आणि आकड्यामुळे आर्थिंग मधून विद्युत प्रवाह जमिनीत उतरल्यामुळेच ही दुर्दैवी घटना घडल्याचे मेंढपाळांनी सांगितले . मेंढपाळालाही विद्युत करंट लागला होता. परंतु त्यांना लांब फेकल्यामुळे ते बचावले गेले असे त्यांनी सांगितले. सदर प्रकरणी महावितरणने सर्व सखोल चौकशी करुन मेंढपाळाला मदत करावी, अशी मागणी परीसरातील नागरीक करत आहे.

शिरुर तालुक्यातील रांजणगाव सांडस (ता. शिरुर) या ठिकाणी महीनाभरापुर्वी भिमानदीकाठी मोटारीचा विदयुत प्रवाह नदीपात्रात उतरल्याने गाई पाणी पिण्यासाठी गेल्या असता ६ गायांचा मृत्यू झाला. शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे इतर गाई वाचल्या होत्या. तसेच अनेक ठिकाणी विदयुत तारा जीर्ण झाल्या असून त्या बदलण्यासाठी महावितरणची उदासीनता दिसून येत असून महीनाभरात ही दुसरी घटना आहे.