पाबळ (सुनिल जिते) कान्हूर-मेसाई, पाबळ, केंदुर, चिंचोली आदी गावांसह बारा गावांचा पाणीप्रश्नावर शेतकरी पुन्हा एकदा पेटला असुन विधानसभेची निवडणुक होण्याआधी पाणी प्रश्न मार्गी लागला पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जर पाणी प्रश्न मार्गी लागला नाही तर नेत्यांना गावात फिरु देणार नसल्याचे सांगत आमच्या गावाला शासकीय निधी नाही दिला तरी चालेल पण आम्हाला आधी पाणी द्या अशी आक्रमक भुमिका बारा गावच्या शेतकऱ्यांनी घेतली आहे.
कान्हूर मेसाई गावात बुधवार (दि २६) रोजी नवीन ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा घेण्यात आली. कान्हूर गावच्या सरपंच चंद्रभागा खर्डे यांच्या अध्यक्षतेखाली सभेस सुरुवात झाली. गावातील अनेक प्रश्नावर यावेळी चर्चा झाली. गावातील अनेक युवकांनी ग्रामसभेत पाणीप्रश्न मांडला. तसेच कान्हूर, पाबळ, केंदूर, चिचोली तसेच इतर गावांना सोबत घेऊन विधानसभेची निवडणुक होण्याआधी पाणी प्रश्न मार्गी लागला पाहिजे. जर पाणी प्रश्नमार्गी लागला नाही. तर कोणत्याही राजकीय नेत्यांना गावात फिरु देणार असे ग्रामस्थांनी ग्रामसभेत सांगितले.
तसेच पाणी प्रश्नासाठी गावातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी राजकीय भुमिका बाजूला ठेऊन एकत्र येऊन काम करण्याचे ग्रामसभेत ठरले. आमच्या गावाला शासकीय निधी नाही दिला तरी चालेल पण आम्हाला आधी पाणी द्या, वेळप्रसंगी रक्त सांडू पण हक्काचं पाणी द्या अशीही विनंती ग्रामस्थांनी यावेळी केली.
विधानसभा निवडणुकीपुर्वी सर्व्हेक्षणाच काम पुर्ण करा…
नागपुर येथे झालेल्या बैठकीमध्ये बारा गावाच्या पाणीप्रश्नाबाबत सर्व्हेक्षणासाठी पत्र काढले होते. विधानसभा निवडणुकीच्या आधी ते सर्व्हेक्षण पुर्ण करुन या कामाची पुढील वाटचालीस सुरुवात करावी अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आली. तसेच आमदार दिलीप वळसे पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांची रविवारी वेळ घेऊन १२ गावातुन १०० ते २०० दुचाकी घेऊन १२ गावातील ग्रामसभेचे पत्र देण्याचाही यावेळी एकमताने निर्णय घेण्यात आला. तसेच पावसाळी अधिवेशनामध्ये बारा दुष्काळी गावातील शेतीसाठी पाण्याचा विषय मांडुन त्यावर तोडगा काढण्यासाठी विनंती करणार असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.
बारा गावच्या पाण्यासाठी लोकशाही मार्गाने उपोषण…
कान्हूर मेसाई येथे ग्रामसभा घेवुन शासनाच्या सर्व्हेबद्दलच्या भुमिकेवर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. तसेच अगामी काळात सर्व्हेचे काम वेगवान व्हावे. यासाठी पुन्हा पत्रव्यवहार करुन येत्या आठ दिवसात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संपुर्ण गावातील आठ वर्षापासून तर साठ वर्षापर्यंतचे युवा आणि जेष्ठ नागरिक या सर्वांनी एकदिवसीय उपोषण करण्याचे ठरवले आहे. त्याच दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करुन शासनाला “रक्त घ्या पण पाणी द्या” हा संदेश देण्याचा ग्रामस्थांनी निर्धार केला आहे. या ग्रामसभेला गावातील सर्व आजीमाजी पदाधिकारी आणि विशेषतः युवकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
आंधळ दळतंय आण कुत्रं पिठ खातयं, अशी शिरुर-हवेलीत परिस्थिती : चंदन सोंडेकर
शिरुर नगरपरिषद हद्दीमध्ये अनधिकृत गॅस पाईप लाईन त्वरित बंद करा; मनसेची मागणी