राज्यातील वाढत्या अत्याचाराला राज्याचे गृहखाते जबाबदार; खासदार सुप्रियाताई सुळे

इतर

मुंबई: केंद्र व राज्यसरकार महिलांच्याबाबतीत अतिशय असंवेदनशील आहे. दिल्लीत महिला कुस्तीपटूंची केस ज्यापद्धतीने पोलीसांनी हाताळली हा पहिला मुद्दा आणि महाराष्ट्रात सातत्याने महिलांच्या विरोधात ज्यापध्दतीच्या घटना वाढत चालल्या त्याला सर्वस्वी राज्याचे गृहखाते जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पत्रकार परिषदेत केला.दरम्यान मरीन ड्राईव्ह येथील त्या मुलीच्या नातेवाईकांनी आजच भेट घेतली असून सरकारला लवकर यासंदर्भात पाऊले टाकण्याची विनंती करणार असल्याचे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे आज कार्याध्यक्षा म्हणून निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी भवनमध्ये आल्या असता त्यांचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्‍यांनी ढोलताशांच्या गजरात आणि फुलांची उधळण करत जंगी स्वागत केले. त्यानंतर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. माझ्यासाठी अजून तरी लोकशाही आहे त्यामुळे एखाद्याने टिका केली तरी त्यांना टिका करण्याचा अधिकार आहे. मी अजूनही लोकशाहीत जगत आहे असे प्रत्युत्तर टिका करणार्‍यांना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिले.

महाराष्ट्रात गणवेशासोबत अनेक रॅकेट आहेत त्यातील दोन उघड केली आहात त्याबद्दल चॅनलचे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आभार मानले. कारण एका – एका मंत्र्यांकडे दहा ते पंधरा खाती आहेत. जिल्हा परिषद , मनपा या निवडणुका झाल्या नाहीत. हे महाराष्ट्र नक्की कोण चालवत आहे. हे सुपरमॅन नाहीत. सत्ता एका ठिकाणी राहू नये म्हणून शेवटी सत्तेचे विकेंद्रीकरण जे चव्हाणसाहेबांनी केले. आज ते चित्र उलट दिसत आहे. पुण्यात एक आयुक्त शहर चालवत आहे. एवढ्या नगरसेवकांचे काम एकटा माणूस करतोय. जिल्हा परिषद एकच माणूस चालवत आहे. हे अशक्य आहे. कारण ही सत्ता एकाच ठिकाणी केंद्रीत ठेवणे लोकशाही म्हणा किंवा लोकशाहीपासून दूर हा देश आणि राज्य चालत आहे हे दर्शवते आहे असेही खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

अशापध्दतीने करोडो रुपयांच्या जाहिराती देणारे कोण आहेत याचा शोध मी आणि अजितदादा घेत आहोत. मात्र अजूनही असा हितचिंतक कोण सापडला नाहीय. असे हितचिंतक आपल्यालाही मिळाले पाहिजेत आणि फुलपेज करोडो रुपयांच्या जाहिराती पेपरला मिळाल्या तर आमचेही भले होईल आणि त्यांचेही भले होईल त्यामुळे अशा लोकांच्या शोधात आहोत. असे हितचिंतक सापडले तर आमचा नंबर त्यांना द्या असे आवाहनही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केले.

हे आपण हसण्यावारी नेतोय पण हे फार दुर्दैवी आहे. पक्ष आणि सत्तेत असणारे एवढे मोठे लोक जाहिरातीमध्ये दंग होत असतील तर या राज्याचे काम कुठल्या दिशेने सुरू आहे याबाबत चिंता व्यक्त करतानाच सरकारला पॉलिसीकडे लक्ष द्यायला वेळ नाही. फक्त तू तू मै मै किंवा तू पोस्टर लावले म्हणून मी लावले जर याच्यातच ते राहणार असतील तर पॉलिसीचा कोण विचार करणार आहे असा सवालही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केला.

कार्याध्यक्ष पदातील कामाचे विभाजन हे क्लीअरकट झालेले आहे. माझा मतदारसंघ महाराष्ट्रात आहे. अर्थात संघटनेची जबाबदारी माझ्यावर आली आहे. त्यामुळे दिल्लीतील लोकसभा आणि प्रफुल पटेल यांना राज्यसभा असे कामाचे क्लीअरकट विभाजन झाले आहे. त्यामुळे सर्व जबाबदारी माझ्या एकटीवर नाहीय. टीमवर्क म्हणून आम्ही देशात काम करतोय. प्रत्येकाचा रोल वेगवेगळा आहे. घरात लग्न असले की एकटाच धावपळ करत नाही तर प्रत्येकाला जबाबदारी दिलेली असते त्यामुळे पक्ष म्हणून, एक कुटुंब म्हणून आम्ही काम करतो आहोत. हे काम करत असताना प्रत्येकाची वेगवेगळी जबाबदारी वाटण्यात आली आहे.लोकसभेच्या तयारीला राष्ट्रवादी काँग्रेसने केव्हाच सुरुवात केली आहे. त्याबाबत अनेक बैठका झाल्या आणि सविस्तर चर्चाही झाल्या आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये या चर्चा घेतल्या जातील असेही खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

अमिताभ बच्चन सर्वांना सगळ्याच सिनेमात हवा असतो. त्यांचा आवाजही चालतो, त्यांचा फोटोही चालतो, त्यांचा लूकपण चालतो, त्याचा ऑटोग्राफही चालतो. त्यामुळेच अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत असे स्पष्ट करत खासदार सुप्रियाताई सुळे यांनी अजितदादांवर होत असलेल्या चर्चेला उत्तर दिले.

आपण चेहर्‍यापेक्षा पॉलिसीवर का काम करत नाही असा सवाल करतानाच तुम्ही चेहर्‍याला मत देणार की पॉलिसीला मत देणार आहात. मला वाटते आपण पॉलिसीला महत्त्व दिले पाहिजे. केंद्राचे सोशल जस्टीस खाते पाहिले तर किती निधी आला, किती कार्यक्रम जाहीर झाले. मी संसदेत एक प्रश्न टाकला आहे, अनेक ‘एम्स’ झाले असे जाहीर केले जाते परंतु किती ‘एम्स’ ऑपरेशनल आहेत आणि किती डॉक्टर आहेत याबाबत कधी विचारणा केली गेली का? त्यामुळे मुळ मुद्दा पॉलिसीचे काय झाले हाच समोर येतो असेही खासदार सुप्रियाताई सुळे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना म्हणाल्या.

फेविकॉलची जाहिरात केल्याबद्दल मिश्किल टिप्पणी करत खासदार सुप्रियाताई सुळे यांनी शिंदे – फडणवीस यांचे आभार मानले. सध्या प्रिंटरला बिझनेस मिळत असेल तर ठीक आहे. मात्र राजकारणी लोकांनी बेकायदा पोस्टर लावताना त्याचे पैसे भरले पाहिजेत अशी विनंती खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे बेकायदा पोस्टर लागतात तेव्हा त्याच्या वेदना होतात असे स्पष्ट करतानाच तुम्ही कायदे बनवता आणि तुम्हीच ते तोडणार असाल तर ते दुर्दैव आहे अशा शब्दात खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सरकारला खडसावले. आंब्याच्या झाडावर दगड मारला जातो बाभळीवर कोण मारत नाही. त्यामुळे भाजप आमच्यावरच टिका करणार दुसर्‍या कुणावर करणार असे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.