शिरुर (तेजस फडके): सध्या राज्यात साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु आहे. मोठ्या प्रमाणात ऊस लागवडीचे क्षेत्र असून त्यात पाणी पातळी कमी होत चालली आहे. त्यामुळे ऊस वाळू नये व वेळेवर गाळपासाठी जावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. या त्यांच्या हतबलतेचा गैरफायदा तोडणी व वाहतूकदार घेत असुन ते शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणुक करत आहेत. तसेच शेतकऱ्यांनी याबाबत कारखान्याच्या व्यवस्थापणाशी संपर्क साधला असता ते लुबाडणुकदारांनाच पाठीशी घालत असल्याचे चित्र आज राज्यात दिसत आहे.
याबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा तसेच तोडणी व वाहतूकदारांनी शेतकऱ्यांकडे पैसे मागू नये आणि यापूर्वी काढलेल्या परिपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी राज्य जनता दलाच्या शिष्टमंडळाने एका निवेदनद्वारे साखर संचालक मंगेश तीटकारे यांच्याकडे केली आहे. या शिष्टमंडळामध्ये जनता दल सेक्युलर पक्षाचे जेष्ठ नेते व माजी आमदार प्रा. शरद पाटील, प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, सांगली जिल्हाध्यक्ष के.डी शिंदे व संजय आयनापुरे उपस्थित होते.