sand-mafia-shirur

घोड धरणात अवैध वाळू उपसा; कारवाईच्या नावाखाली आर्थिक तडजोडींचा संशय…? 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्याच्या सीमेवरील घोड धरण परिसरात अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर सुरु असून, प्रशासनाकडून कारवाई होत असल्याचा केवळ देखावा केला जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. कारवाईच्या नावाखाली काही अधिकाऱ्यांकडून वाळू माफियांशी आर्थिक तडजोड होत असल्याची चर्चा सध्या परिसरात जोर धरत आहे. त्यामुळे अवैध वाळू उपशाचा धंदा दिवसाढवळ्या सुरु असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

घोड धरण परिसरात अनेक ठिकाणी यांत्रिक बोटी, पंप आणि इतर यंत्रसामग्रीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात आहे. रात्रीच नव्हे तर दिवसाही बिनधास्तपणे वाळू काढून ट्रॅक्टर आणि डंपरमधून वाहतूक केली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे धरणाच्या सुरक्षेसह पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण झाला आहे.

आत्तापर्यंत सात वेळा कारवाई पण…

शिरुर आणि श्रीगोंदा महसूल विभागाकडून दोन वर्षात आत्तापर्यंत सात वेळा वाळूच्या यांत्रिक बोटिंवर कारवाई केल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ही कारवाई केवळ दिखाव्यासाठीच होत असल्याची चर्चा आहे. चार दिवसांपूर्वीच घोड धरणातील यांत्रिक बोटी फोडण्याची कारवाई करण्यात आली होती. मात्र त्या प्रकरणात एकाही वाळू माफियावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तसेच चार दिवस उलटूनही पत्रकारांनी वारंवार महसूलच्या अधिकाऱ्यांना कारवाईबाबत माहिती विचारली असता माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे ही कारवाई केवळ ‘दिसण्यासाठी’ करण्यात आली होती का…? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे.

हजारो ब्रास वाळू अन लाखोंची उलाढाल… 

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, धरण परिसरात रोज हजारो ब्रास वाळू उपसा होत असून, त्यातून लाखो रुपयांची उलाढाल केली जात आहे. या काळ्या धंद्याला काही राजकीय पदाधिकारी आणि स्थानिक पुढाऱ्यांचा पाठिंबा असल्याचीही दबक्या आवाजात चर्चा आहे. त्यामुळेच महसूल विभाग आणि संबंधित यंत्रणा ठोस कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप होत आहे.

घोड धरणाची सुरक्षा वाऱ्यावर…?

घोड धरण परिसरातील अवैध वाळू उपशामुळे पाण्याच्या साठ्यावर आणि धरणाच्या सुरक्षिततेवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच धरणाच्या काठावरील भागात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडत असून, भविष्यात याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. दरम्यान, अवैध वाळू उपसा थांबवण्यासाठी प्रशासनाने केवळ दिखाऊ कारवाई न करता संबंधित वाळू माफियांवर कठोर गुन्हे दाखल करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. अन्यथा घोड धरणातील वाळू माफियांचे साम्राज्य अधिकच बळकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

न्हावरे येथे कांदा उत्पादकांचा आक्रोश मेळावा; भारत दिघोळे साधणार शेतकऱ्यांशी थेट संवाद