लोकसभेच्या तोंडावर शिरुर तालुक्यातील बारा गावचा पाणी प्रश्न पुन्हा पेटणार…? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांमध्ये नाराजी

मुख्य बातम्या शिरूर तालुका

कान्हूर मेसाई (सुनील जिते) ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिरुर तालुक्यातील कायम दुष्काळी भागातील १२ गावातील शेतकरी व ग्रामस्थ आक्रमक झाले असुन येथील पाणी प्रश्न पेटण्याची चिन्हे दिसु लागली आहेत. मात्र यावर यासर्व गावातील शेतकरी नाराज असुन राजकीय कोणत्याही प्रकारे पाण्याविषयी ठोस भूमिका घेतली नाही. तसेच येणाऱ्या निवडणुकीच्या काळात पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावातील मतदार काय भूमिका घेणार…? यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

शिरुरच्या पश्चिम भागातील पाबळ, केंदूर, धामारी, खैरेनगर, खैरेवाडी, हिवरे, कान्हूर-मेसाई, मिडगुलवाडी, चिंचोली-शास्ताबाद, मलठणची लाखेवाडी, सोनी सांगवी व वरुडे आदी गावे गेली कित्येक वर्षे पाण्यावाचून व्याकूळ आहेत. एखादा ठोस व कायमचा पाणीस्त्रोतच या गावांना मिळू शकलेला नसल्याने ही सर्व गावे पाणी संघर्ष कृती समितीच्या नावाने एकत्र आली होती. कान्हूर-मेसाई व धामारी येथील दोन बैठकांनंतर हि समिती ‘अ‍ॅक्टीव मोड’मध्ये होती .समितीच्या निर्णयानुसार या सर्व गावांनी विशेष ग्रामसभा घेऊन पाण्याच्या आंदोलनात थेट उतरण्याचा, संघर्ष समितीला आंदोलनांच्या निर्णयांचा, पाणी प्रश्नासाठी प्रशासकीय, राजकीय, सामाजिक बैठका घेण्याचा अधिकार दिला.

 

तसेच मोठ्या आंदोलनांसाठी संपूर्ण गावे उत्स्फूर्तपणे बंद करुन आंदोलनांमध्ये उतरण्याचा निर्णय या ग्रामसभेत घेण्यात आला. विशेष म्हणजे प्रत्येक गावात ग्रामपंचायत पातळीवर आणि पक्षीय पातळीवर दोन-तीन पक्ष सक्रिय असले तरी यापुढील काळात गावचे, गण-गटाचे, पक्षांचे, तालुक्याचे राजकारण पुर्ण बंद करून केवळ पाणीप्रश्नावरच लक्ष केंद्रित करण्याचा निर्णयही या ग्रामसभांमध्ये घेतला गेला होता. परंतु जसे लोकसभेचे बिगुल वाजले गेले तसे पाणी प्रश्न कोणाच्या तोंडातून निघेना. त्यानंतर आता पुन्हा पाण्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. “आमचे रक्त घ्या, पण पाणी द्या” अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी शिरुर तालुक्यातील पाणी प्रश्न पेटणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.

 

राजकारणी तुपाशी अन जनता उपाशी…

पाणी प्रश्नाचे राजकीय भांडवल करुन राजकारण्यांनी सरपंच, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, कारखान्याचे संचालक, मार्केट कमीट्या, खरेदी विक्री संघ, जिल्हा नियोजन सदस्य आदी विविध पदांवर सत्ता उपभोगली. पण कधीही न भरणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या झोळीत मताचे दान टाकणाऱ्या शेतकऱ्यावर अजूनही शेतात उभा राहून मृगजळाला पाणी समजण्याची वेळ आली आहे. याला सर्वपक्षीय नेते जबाबदार आहेत. खरं तर राजकीय इच्छाशक्ती अभावी शिरुर तालुक्यातील या शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही हे वास्तव कुणी नाकारु शकत नाही. त्यामुळे “सारा गाव मामाचा पण एक बी नाय कामाचा” असे म्हणण्याची वेळ सर्व शेतकऱ्यांवर आली आहे.

सावधान; पालकांनो शिरुर मधील इंग्लिश माध्यमातील शाळांमध्ये आपल्या मुलांना प्रवेश घेताय;तर हि बातमी नक्की वाचा

Video; कोल्हेंच्या PA नां MIDC मध्ये यायला वेळ आहे, पण आमची काम करायला वेळ नाही काँग्रेस कार्यकर्त्याची नाराजी

शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्था अध्यक्षासंह पाच जणांवर अँट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल