वाघोली: वाघोली (ता. हवेली) येथे एका बावीस वर्षीय युवकाचा त्याच्या प्रेयसीनेच चाकूने भोकसुन खून करुन स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली असुन यशवंत महेश मुंढे (वय २२) सध्या (रा. वाघोली, मूळ रा.लातूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अनुजा महेश पनाळे (सध्या रा. वाघोली, मूळ रा. अहमदनगर) असे खून केलेल्या तरुणीचे नाव असुन यशवंतचा खून केल्यानंतर अनुजा हिने स्वत:ची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. परंतु तिला वेळेत हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याने तिचे प्राण वाचले. प्रेमप्रकरणातून झालेल्या खुनाच्या या घटनेने वाघोली परिसरातील एकच खळबळ उडाली असुन याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार (दि 29) मे रोजी वाघोली येथील रायसोनी कॉलेज रोडवर खाजगी वसतिगृहात पहाटेच्या सुमारास हि घटना घडली असुन यशवंत आणि अनुजा हे दोघेही रायसोनी कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्सच्या द्वितीय वर्षात शिकत होते. त्यामुळे अनुजा व यशवंत मध्ये प्रेम संबंध होते. तो सारखा तिच्यावर संशय घेत तिला अनेक बंधने घालत होता. त्यामुळे त्यांच्यात सारखी भांडणे होत होती. रविवारी (दि 28) रोजी रात्री 11 च्या सुमारास अनुजा हि यशवंत राहत असलेल्या खाजगी वसतिगृहातील खोलीत अभ्यासासाठी गेली. ते दोघे एका खोलीत तर बाकीचे विद्यार्थी दुसऱ्या खोलीत होते. मध्यरात्री त्यांचे पुन्हा भांडण झाले. त्यानंतर अनुजा हिने चाकूने यशवंतच्या छातीवर व पोटावर वार केले. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.
यशवंतवर हल्ला केल्यानंतर अनुजा हि खोलीतून खाली पळून आली आणि स्वतःच्या हाताची नस कापून ती वसतिगृहा समोरील खाऊ गल्लीच्या बाकडयावर बसलेली असताना तिथुन जाणाऱ्या इतर मुलांनी तिची अवस्था पाहून पोलिस नियंत्रण कक्षाला कळवले आणि अनुजाला खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांना खुनाची घटना कळाल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार हे करत आहेत.
वसतिगृहातील विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे…?
वाघोली येथील खाजगी वसतिगृहाची इमारत ही एका स्थानिक व्यक्तीच्या मालकीची असुन ती दिल्लीतील खाजगी कंपनीने भाडे तत्वावर घेतली आहे. तेथे मुलांचे वसतिगृह आहे. या ठिकाणी एका खोलीत चार ते पाच विद्यार्थी राहतात. तसेच वसतिगृहात प्रवेश करण्यासाठी एकच दरवाजा आहे. तेथेही कायम सुरक्षा रक्षक तैनात असतो. तरीही अनुजा हिने रात्री वसतिगृहात प्रवेश करुन भांडणातून प्रियकराचा खून केला. याबाबत तेथील सुरक्षा रक्षक आणि खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मात्र पत्रकारांना माहिती देण्यास टाळाटाळ करत आम्हाला घडलेल्या प्रकाराबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले.
प्रेम प्रकरणातून अनेक गुन्हे घडत आहेत त्या मुळे मुलांना बाहेर शिक्षण घेण्यासाठी पाठवले पाहिजे का नाही पालक घाबरून गेले आहेत आणि इतर सुरक्षा व्यवस्था वर ही अविश्वास निर्माण होत आहे