मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभावी नेते अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात निधन झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना दाट धुक्यामुळे विमान धावपट्टीचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहितीत सांगण्यात आले असले, तरी या घटनेमागे घातपात आहे का, यावर राज्यभर तीव्र चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवार मुंबईहून बारामतीकडे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी निघाले होते. विमानाने दोनदा लँडिंगचा प्रयत्न करून ‘यू-टर्न’ घेतल्याची माहिती आहे. अखेर लँडिंगदरम्यान धावपट्टीच्या बाजूच्या खड्ड्यात विमान घसरून पेट घेतल्याचे सांगण्यात आले.
अपघातस्थळी स्वतः जाऊन पाहणी करणारे खा. शरद पवार यांनी ‘धावपट्टीजवळ खड्डा कसा काय असू शकतो?’ असा प्रश्न उपस्थित केला. या विधानानंतर संशय अधिक गडद झाला असून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या मृत्यूमागे राजकीय कारस्थान असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनीही विरोधी नेत्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. मात्र शरद पवार यांनी हा निव्वळ अपघात असल्याचे सांगत चौकशी अहवाल येईपर्यंत तर्कवितर्क टाळण्याचे आवाहन केले आहे.
अजित पवार हे महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहिलेले नेते होते. त्यांनी सहा वेळा हे पद भूषवले असून विविध सरकारांमध्ये महत्त्वाची खाती सांभाळली. रोखठोक शैली, प्रशासनावर मजबूत पकड आणि ‘कामाचा माणूस’ अशी त्यांची ओळख होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच आणि महाविकास आघाडीत त्यांच्या पुनरागमनाची शक्यता असताना झालेले हे निधन अनेक प्रश्न निर्माण करणारे ठरत आहे.
अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आक्रमक, निर्णयक्षम आणि प्रभावी नेतृत्व अचानक हरपले असून, या अपघातामागील सत्य काय आहे, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.